नाशिक : उद्योगमंत्री उदय सामंत सोमवारी (दि. १२) नाशिक दौऱ्यावर असून, यावेळी ते उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधणार आहेत. महिंद्रा ॲण्ड महिंद्राने चीनच्या शानक्सी ऑटोमोबाइल कंपनीशी केलेला कारनिर्मितीचा २५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प अन्य राज्यात जात असल्याच्या चर्चेसह नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राशी निगडीत मागण्यांबाबत उद्योजक मंत्री सामंत यांच्याशी उद्योजक चर्चा करणार आहेत. (Entrepreneurs are going to discuss with Entrepreneurs Minister Samant)
महिंद्रा कंपनीने चीनच्या शानक्सी ऑटोमोबाइल कंपनीशी केलेल्या कारनिर्मितीचा प्रकल्प गुजरात व अन्य राज्यांत जाऊ नये, तो महाराष्ट्रातच त्यातही नाशिकमध्येच यावा, अशी आग्रही मागणी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्राशी निगडीत केलेल्या घोषणांमध्ये नाशिकच्या वाट्याला काहीच दिले नसल्याने उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजूरबहुला येथे भूसंपादन करून भूखंडवाटप करणे, आयटी पार्कला चालना देणे, अतिरिक्त अक्राळे औद्योगिक वसाहत सुरू करणे, भगर क्लस्टर साकारणे, कायमस्वरूपी एक्झिबिशन सेंटर सुरू करणे, इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब कार्यान्वित करणे, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारणे, सीईटीपीचा प्रश्न मार्गी लावणे आदी उद्योजकांच्या मागण्या तातडीने सोडविणार असल्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात त्यातील एकही मागणी पूर्णत्वास आली नसल्याने, नाशिकला मोठा प्रकल्प आणण्याबरोबरच या मागण्यांबाबत उद्योजक उद्योगमंत्री सामंत यांच्याशी चर्चा करणार आहेत.
उद्योगमंत्री आज सोमवारी (दि. १२) सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित केलेल्या छत्रपती संभाजीनगर महायुती समन्वय पदाधिकारी बैठक आणि संवाद यात्रेनिमित्त नाशिकमध्ये येत आहेत. याचवेळी ते उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधणार आहेत.