त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक चिघळणार, असे दिसत आहे. त्र्यंबकेश्वरला आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शासनाने गोदावरीवर घाट बांधण्याचे व त्यासाठी रस्ते बांधणीचे काम हाती घेतले आहे. याबाबत शेतकरी संतप्त झाले आहेत. डीपी रस्ते, साधुग्राम, कचरा डेपोसाठी जमिनी घेण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम सुरू केले आहे. मागील आठवड्यात शेतकऱ्यांनी एकत्र येत घाटांचे काम बंद पाडले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी काम सुरू झालेले पाहून शेतकरी साखळी उपोषणास बसले आहेत.
तरीही शासनाने त्याची दखल घेतली नाही. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह शनिवारी येथे आले असता त्यांनी सरकारी भावाने मोबदला मिळेल, तुम्ही घ्या अथवा नका घेऊ, असे सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांना वेळही दिला नाही. मंदिर आणि कुशावर्तावर जात साधू-महंतांच्या स्वच्छता अभियानात भाग घेतला. त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले.
रविवारी सकाळपासून आंदोलनस्थळी लाकडाचे ढिगारे आणून टाकले. बाधित शेतकऱ्यांनी न्याय मिळणार नसेल तर आत्मदहन करण्याचा पवित्रा घेतला आहे. रविवारी आंदोलनस्थळी आमदार हिरामण खोसकर यांनी भेट दिली.
त्यांच्या उपस्थितीत जेसीबी यंत्र, ट्रक व इतर यंत्रसामग्री दूर हटवण्यास सांगितले. काम सुरू केल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन घडणाऱ्या प्रकारास सरकार जबाबदार राहील, असा इशारा दिला. आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी राहत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
जमीन घेतल्याने शेतकऱ्यांची मुले उपाशी ठेवण्याचे काम होणार असेल तर आम्हा साधूंना तो कुंभमेळा नको, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
निषेध फलक काढण्याचा निरोप आंदोलकांनी आंदोलनस्थळी निषेध फलक लावले आहेत. हे फलक काढण्याचा निरोप सरकारी यंत्रणेकडून देण्यात येत आहे. जलसंपदाचे अधिकारी 'आमच्या पुरते बोला' असे म्हणत शेतकऱ्यांत फूट पाडत असल्याचे बाधितांचे म्हणणे आहे.