त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पिंप्री येथील आश्रमशाळेतील दोन दिवसांपासून बेपत्ता विद्याथ्यनि गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. वाढदिवशीच तो गायब झाल्याने त्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.
१२ मार्च रोजी दुपारी ३ च्या सुमारास संजय सदूनडगे (१७) हा इयत्ता १० वीतील विद्यार्थी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला. अशी तक्रार मुख्याध्यापक सुनील विठ्ठल जाधव यांनी १३ मार्च रोजी त्र्यंबक ठाण्यात केली होती.
१५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास शाळेच्या पाठीमागे सुमारे २ किमी अंतरावर असलेल्या डोंगरावरील झाडीत गुरे चारण्यासाठी गेलेल्या मुलांना झाडावर सुनीलचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अशोक बोडके यांचे पथक घटनास्थळावर पंचनामा केला.
मयत संजय हा काही वर्षांपासून या आश्रमशाळेत निवासी विद्यार्थी होता. त्याचे दोन भाऊदेखील त्याच शाळेत शिक्षण घेत असल्याचे समजते. तो त्र्यंबक तालुक्यातील बुरूडपाडा या गावातील आहे. तो बेपत्ता झाल्यापासून त्याचा शोध त्याचे आई-वडीलदेखील घेत होते. शाळेतील विद्यार्थी डोंगरावरील झाडीत अभ्यासाला जात असायचे, अशी चर्चा आहे.
आश्रमशाळेत गोर-गरीब जनतेची मुले अपरिहार्यता म्हणून शिक्षण घेतात. शासन त्यांच्याबाबत बेफिकीर असल्याचे वारंवार होणाऱ्या घटनेवरून दिसते.- भगवान मधे, एल्गार कष्टकरी संघटना, संस्थापक अध्यक्ष