नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गाळप हंगाम संपल्यामुळे साखरेची आवक घटली असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडल्यामुळे साखरेच्या दरात गेल्या दोन महिन्यांत किलोमागे २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात ४५ रुपयांवर असलेली साखर आता ७० ते ७५ रुपये किलोवर पोहोचली आहे. घाऊक बाजारातही दर ६ हजार ते ६ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेले आहेत. श्रावण महिन्यापासून सुरू झालेल्या सण समारंभामध्ये औद्यागिक कारखान्यांकडून साखर वापराच्या वाढत्या प्रमाणामुळे दर आणखी वाढण्याची घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शक्यता
कारखान्यांमधील साखरेचा साठा कमी झाला असून, नवीन गाळप हंगाम दि. १५ नोव्हेंबरनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन साखर बाजारात येण्यासाठी डिसेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी असे सलग सण-उत्सव असल्यामुळे मागणी वाढतच जाणार आहे. शहरात दररोज सुमारे एक हजार ते दीड हजार क्विंटल, तर महिन्याला ३० ते ४५ हजार क्विंटल साखरेची मागणी असते.
देशातील साखरेच्या वापरापैकी सुमारे १५ ते २० टक्के वापर घरगुती, तर ८० टक्क्यांपर्यंत वापर औद्योगिक क्षेत्रात होतो. शीतपेय, आइस्क्रीम, बेकरी, कुकीज आणि मिठाई उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर केला जात असतो. इथेनॉल निर्मितीसाठी वापराला परवानगी मिळाल्यामुळे साखरेसाठी उपलब्ध होणाऱ्या उसावरही मोठा परिणाम झाला आहे. गेल्या चार वर्षांत देशातील साखर उत्पादनात घट झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
एकूणच साखरेचा दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासाठी औद्योगिक वापरासाठी लागणारी साखर आयात करण्यास सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. सध्या साखर आयातीवर १०० टक्के कर असल्याने किमान २० लाख टन साखर आयातीला परवानगी दिल्यास घरगुती बाजारातील पुरवठा वाढून दर काही प्रमाणात नियंत्रणात येऊ शकतात
साखरेची आवक थांबल्याने दरात वाढ
गाळप हंगाम संपल्यामुळे शहरातील बाजारपेठेत साखरेची आवक थांबली असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला आहे. नाशिककरांनाच दररोज सुमारे १०० ते १४०० क्विंटल, तर महिन्याला ३० हजार ते ४५ हजार क्विंटल साखरेची आवश्यकता आहे. गेल्या चार वर्षांत देशातील साखरेचे उत्पादन घटले आहे. त्यातच इथेनॉलनिर्मितीसाठी उसाची मागणी वाढल्यामुळे साखरेच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. परिणामी, महिनाभरात किलोमागे साखरेच्या दरात ३० रुपयांची, तर गुळाच्या दरात १५ रुपयांची वाढ झाली आहे