नाशिक : विकास गामणे
जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आता केवळ त्रासापुरता उरलेला नसून तो थेट नागरिकांच्या मुळावर उठला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणारी ही कुत्री आता संपूर्ण जिल्ह्यासाठी दहशतीचे कारण बनली आहेत. गेल्या अडीच वर्षांत तब्बल २ लाख १८ हजार ८७४ निष्पाप नागरिकांचे कुत्र्यांनी निर्दयपणे लचके तोडले आहेत.
सर्वात चीड आणणारी बाब म्हणजे या हिंस्त्र कुत्र्यांच्या चाव्यामुळे ११ निष्पाप लोकांचा नाहक बळी गेला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रस्त्यावरून चालणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत पाय ठेवण्यासारखे झाले आहे. पहाटे फिरायला जाणारे वृद्ध असोत, कामावरून उशिरा परतणारे तरुण असोत की शाळेत जाणारी चिमुकली मुले, मोकाट श्वान कोणालाही सोडायला तयार नाहीत.
निष्पाप बालकांचे लचके तोडले जात असताना आणि नागरिक रक्ताच्या थारोळ्यात पडत असताना प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे. घराच्या संरक्षणासाठी कुत्रा पाळण्यात येतो, परंतु मोकाट कुत्र्यांच्या वाढीवर नियंत्रण राहत नसल्याने त्यांच्याकडून नागरिक व जनावरांवर भीषण हल्ले होत आहेत.
आकडेवारीनुसार २०२४ ते जून २०२६ या अडीच वर्षांच्या काळात तब्बल २ लाख १८ हजार ८७४ नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. यात सन २०२४ मध्ये ७१ हजार ३०, सन २०२५ मध्ये ९४ हजार १७३ तर, जानेवारी २०२६ ते जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत ५३ हजार ६७१ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे. याच अडीच वर्षांत रेबिजमुळे तब्बल ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
"कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रशासकीय पातळीवर लशींच्या वाढीव साठ्यासाठी निधी देणे गरजेचे आहे. पालिकांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे."— सिद्धार्थ वनारसे (माजी सदस्य, जिल्हा परिषद)
सन २०२४: ४
सन २०२५: ५
सन २०२६: २
जागा धुवावी: कुत्रा चावल्यास सर्वात अगोदर ती जागा १० ते १५ मिनिटे नळाच्या वाहत्या पाण्याने आणि साबणाने स्वच्छ धुवावी, ज्यामुळे लाळ निघून जाईल.
जखम कोरडी करावी: स्वच्छ कापडाने जखम पुसून कोरडी करावी.
रुग्णालयात जावे: घरगुती उपचार न करता जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबिज आणि धनुर्वाताची लस घ्यावी.
पदार्थ लावू नये: जखमेवर कोणतीही पावडर, तेल किंवा मलम लावू नये.
पट्टी बांधू नये: जखमेवर घट्ट पट्टी बांधू नये.