मनमाड : पुढारी वृत्तसेवा
सत्ताधारी आणि विरोधी नगरसेकांनी शहरातील समस्या, अतिक्रमण मोहीम, सफाई कामगार भरती यासह इतर काही मुद्द्यांवर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरून जाब विचारला. त्यामुळे सभा वादळी ठरली. सभेत विषय सूचीवर असलेल्या २४ पैकी २३ ठराव एकामताने मंजूर झाले, तर एक विषय स्थगित ठेवला. मंगळवारी (दि. २१) झालेल्या या सभेत काही विषयांवर सत्ताधारी नगरसेकांनी आक्रमक भूमिका घेऊन घरचा आहेर दिला, त्यामुळे सभा चर्चेचा विषय ठरली.नाशिक
नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सभेचे कामकाज सुरू झाले. लिपिक किरण आहेर यांनी विषय सूचीवरील ठराव सभेसमोर ठेवल्यानंतर चर्चा सुरू झाली. विषय क्रमांक १८ स्थगित ठेवत उर्वरित २३ ठरावांवर साधक बाधक चर्चा करून ते एकामताने संमत केले.
त्यानंतर आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा सुरू होताच नगरसेक राकेश ललवाणी, अमजद पठाण, अमीन पटेल यांनी काही दिवसांपूर्वी शहरात राबविलेली अतिक्रमण हटाव मोहीम आणि वारसा हक्काने सफाई कामगार भरतीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी अतिक्रमण काढताना दुजाभाव झाला.
तोंड पाहून अतिक्रमण काढण्यात आले आणि आस्थापना विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. या मुद्द्यावर सत्ताधारी सोबत विरोधी नगरसेकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
डॉ. सुहास जाधव यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रभागातील विकासकामे सांगितली, तर ते थेट आमचे फोन नंबर ब्लॉक करतात. लोकप्रतिनिधींचे फोन ब्लॉक केले तर आम्ही जनतेची कामे सांगायची कोणाला? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
सत्ताधारी पक्षाचे नगरसेक असूनही प्रशासनाकडून कामे होत नसल्याचे त्यांनी उघड केले. विरोधी पक्षाचे नगरसेक अमोल नरवडे आणि बापू दराडे यांनीही प्रशासकीय कारभारावर जोरदार हल्ला चढवला. पालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने कामात दुजाभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेकांनी वारंवार सूचना देऊन आणि मागण्या मांडूनही प्रभागांतील कामे रेंगाळत ठेवल्याचे त्यांनी सांगितले. शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी नगरसेक अमोल नरवडे यांनी केली.
नगराध्यक्ष पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेकांच्या संतापाची दखल घेत प्रशासनाच्या चुकीच्या कामांमुळे नगरसेकांमध्ये नाराजी निर्माण झाल्यामुळे यापुढे हे खपवून घेतले जाणार नसल्याची सूचनावजा इशारा त्यांनी दिला. चर्चेत राजेंद्र पगारे, मयूर बोरसे, महेंद्र शिरसाट, रुपाली पगारे, आहेर यांनी भाग घेतला. संयोजन मुख्याधिकारी शेषाराव चौधरी आणि इतर अधिकाऱ्यांनी केले.
लाड-पागे समितीला अनुसरून एकाही वारसाला नोकरी देण्यात येत नसून पालिकेच्या आस्थापना विभागाकडून आर्थिक लाभ करून घेत परस्पर नोकरी विकल्याचा गंभीर आरोप नगरसेकांनी केला. आरोप खोटा असेल तर नगरसेकपदाचा राजीनामा देईल, असे अमीन पटेल यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी असूनही आपल्याला माहिती दिली जात नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग निवडण्यावाचून पर्याय उरला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.