सिन्नर : मार्च-एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सिन्नर तालुक्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर कृषी व महसूल विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार शासनाने १० कोटी १२ लाख २७ हजार ७०६ रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली असून, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट (डीबीटी) रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
या निर्णयामुळे तालुक्यातील १०९ गावांतील ९ हजार १४२ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, ५ हजार ९१९.९९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीसाठी ही मदत वितरित केली जात आहे. थेट बँक खात्यात निधी जमा होत असल्याने वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आली असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरच अनुदान मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पावसामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानामुळे मोठा दिलासा मिळणार असून, खरीप हंगामातील पुढील शेतीकामांसाठीही या निधीचा आधार मिळणार आहे.
मार्च-एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाईचे अनुदान मंजूर झाले आहे. डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी प्रलंबित आहे, त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी.
- सुरेंद्र देशमुख, तहसीलदार, सिन्नर
या गावांना मंजूर झालेली मदत
सोमठाणे - ८२ लाख ३ हजार ४७० रुपये नायगाव - ६३ लाख १६ हजार ३०० रुपये देवपूर - ५६ लाख ४ हजार १०० रुपये वडगाव पिंगळा - ४५ लाख ६१ हजार ४४० रुपये उजनी - ४२ लाख ८१ हजार ७१० रुपये पिंपळगाव - ३९ लाख ४६ हजार ८३५ रुपये शिवडे - ३७ लाख ७५ हजार ८७० रुपये सांगवी - ३५ लाख ६३ हजार १८० रुपये निमगाव देवपूर - २६ लाख १६ हजार ९६० रुपये कीर्तागळी - २५ लाख ९६ हजार ९०० रुपये