जेजुरी : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या जेजुरीनगरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी (दि. १३) सायंकाळी साडेसहा वाजता आगमन झाले. या वेळी जेजुरी नगरपालिका, जेजुरी देवस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने देवाचे लेणे असणारा भंडारा उधळून माउली आणि वैष्णवांचे स्वागत करण्यात आले.
सोमवारी सासवड-जेजुरी वाट वैष्णवांनी फुलून गेली होती. अभंगाच्या ओवीला टाळ-मृदंगांची साथ... खांद्यांवर भगवी पताका... डोक्यावर तुळशीवृंदावन, पायांना लागलेली विठूमाउलीची ओढ आणि वाटेवरच असणाऱ्या कुलदैवत खंडोबाच्या दर्शनाची ओढ घेऊन भाविक रस्ता चालत होते.
सकाळी बोरावकेमळा येथील न्याहारीनंतर दुपारी शिवरी येथील आदिशक्ती यमाईमातेचे दर्शन, शिवरीकरांचे स्वागत आणि भोजन उरकून दुपारी पालखी सोहळा मल्हारीभेटीसाठी मार्गस्थ झाला. जेजुरी जवळ येताच आणि जेजुरीचा गड दिसताच कानी पडला आवाज मृदंगांचा आणि 'आली पंढरीची वारी माझ्या मल्हारीच्या दारी' हा अभंग. 'यळकोट यळकोट जय मल्हार', 'सदानंदाचा यळकोट' असा गजर वैष्णवांच्या दिंड्यांमधून होत होता.
रात्री उशिरापर्यंत स्थिरावलेल्या दिंड्यांमधून भजन-कीर्तन, तर कुठे भारुडाचे स्वर आळवले जात होते. जेजुरीगडावर या पालखी सोहळ्यानिमित्त शिव आणि वैष्णवभक्तीचा मिलाफ होत असल्याने पहाटेपासून हजारो वारकरी बांधवांनी जेजुरीगड व कडेपठारगडावर जाऊन कुलदैवत खंडोबादेवाचे दर्शन घेतले. पालखी सोहळ्याचा मंगळवारी (दि. १३) मुक्काम वाल्मीकी ऋषींचे समाधिस्थळ असलेल्या वाल्हे गावी असणार आहे.
'ज्ञानोबा-तुकोबा'च्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या निनादात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता दौंड तालुक्यातील वरवंड येथे मुक्कामी दाखल झाला.
वारकऱ्यांसाठी सुमारे १२,०० स्वच्छतागृहे, १५० स्नानगृहे, १२ पाणी टँकर, १२ जेटिंग पंप, ३८,५०० चौरस फूट क्षेत्रात दोन जर्मन तंबू उभारण्यात आले. वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, वीजपुरवठा आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते.