सातपूर : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेसाठी विशिष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असली, तरी या मोहिमेचा आधार घेत महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात नियमित प्रशासकीय कामे रखडून ठेवली जात असल्याची गंभीर तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सातपूर विभागीय कार्यालय हद्दीतील अनेक नागरिक पाणीपट्टी, घरपट्टी, मालमत्ता नोंदीतील घरमालकाचे नाव बदलणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि इतर प्रशासकीय कामांसाठी कार्यालयात जातात. परंतु त्यांना ‘सध्या एसआयआरचे काम सुरू आहे, आता वेळ नाही.
१ ऑगस्टनंतर कागदपत्रे व फाइल घेऊन या, त्यानंतर काम करू’ असे सांगून परत पाठविले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सातपूर विभागीय कार्यालयातील कामकाजाची तातडीने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित कामे थांबविण्याच्या प्रकाराची चौकशी करावी आणि पाणीपट्टी, घरपट्टी, नावबदल, मालमत्ता नोंदी यांसारखी सर्व नागरी कामे पूर्ववत सुरू करण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
"एसआयआरची विशेष मोहीम सुरू असल्याने मी तिथे सध्या कार्यरत आहे. त्यामुळे आता कागदपत्रे जमा करूनही तशीच पडून राहतील. त्यामुळे १ ऑगस्टनंतर कागदपत्रांसह अर्ज घेऊन यावे."— अक्षय लवंद, विभाग निरीक्षक, घरपट्टी व पाणीपट्टी