Nashik Social Leader  
नाशिक

Nashik Social Leader | सर्वसामान्यांचा आवाज ठरलेले नेतृत्व; संजय सानप यांचा सामाजिक प्रवास प्रेरणादायी

Nashik Social Leader | सर्वसामान्यांच्या हाकेला नेहमीच ओ देणारा कार्यकर्ता म्हणून संजय सानप यांची ओळख आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यात धडाडीचे कार्यकर्ते अशी ना ओळख असलेले सिन्नर तालुक्यातील चिंचोली गावचे माजी सरपंच संजय सानप यांचा १ जानेवारी रोजी वाढदिवस साजरा होत असून, त्यानिमित्ताने त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेतला जात आहे. सर्वसामान्यांच्या हाकेला नेहमीच ओ देणारा कार्यकर्ता म्हणून संजय सानप यांची ओळख आहे.

आरंभीच्या काळात सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली. गावातील प्रश्न, नागरिकांच्या अडचणी, गरजू घटकांना मदत यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असल्याने लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसत गेला. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी पुढे राजकारणात प्रवेश केला आणि सामाजिक कार्याला राजकारणाची जोड देत जनतेची कामे हाती घेतली.

चिंचोली गावच्या ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना प्रथमच सरपंचपदाची संधी दिली. या काळात त्यांनी गावाच्या मूलभूत सुविधा, विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष दिले. नांदगाव मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार तथा शिवसेना नेते सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नाशिकसह सिन्नरच्या औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची एकजूट करून त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कामगारांच्या हक्कांसाठी उभे राहत त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी ठामपणे घेतली. या कार्यामुळे पुढील राजकीय वाटचालीत जिल्हा परिषदेची नायगाव गटातून निवडणूक लढवावी, अशी मागणी जोर धरू लागली.

मात्र, स्त्री राखीव आरक्षण पडल्याने त्यांनी सौभाग्यवती सुनीता यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे तसेच युवा नेते उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली सुनीता सानप यांनी जिल्हा परिषदेच्या नायगाव गटातून निसटता पण महत्त्वपूर्ण विजय मिळवला. या विजयानंतर सानप यांच्या माध्यमातून नायगाव गटात विकासाची गंगा पोहोचली. रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि ग्रामीण विकासकामांना गती मिळाली.

संजय सानप यांचा सामाजिक बांधिलकीचा वारसा आणि लोकाभिमुख नेतृत्व आजही अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नायगाव गटात गेल्या पंधरा-वीस वर्षांपूर्वी नायगाव व नऊ गावे तसेच बारागाव पिंप्रीसह सात गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या दूरदृष्टीने त्यावेळी सिन्नर मतदारसंघात प्रादेशिक पाणीपुवठा योजनांचा पाया घातला गेला. या योजनेच्या जलवाहिन्या जुनाट झाल्याने योजनेच्या नूतनीकरणाशिवाय पर्याय उरलेला नव्हता.

ही बाब हेरून तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या सुनीता सानप व संजय सानप त्यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत नायगावसह नऊ गावांच्या योजनेच्या नूतनीकरणासाठी चार कोटी ७२ लाखांचा निधी उपलब्ध करून घेतला. त्यामुळे योजनेतील मोह, मोहदरी, वडझिरे, जायगाव, देशवंडी आदी गावांमधील अंतर्गत जलवाहिनींची दुरुस्ती झाली आणि योजनेत समाविष्ट सर्व गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत झाली.

मुख्यंमत्री ग्रामसडक योजना नायगाव गटासाठी वरदान ठरली. अनेक गावांना जोडण्यासाठी करोडो रुपयांच्या योजना मंजूर करून घेण्यात संजय सानप व जिल्हा परिषद सदस्या सुनीता सानप यांना यश आले. मोहदरी घाटाच्या पायथ्याशी सूर्या ढाबापासून पास्ते मार्ग, पास्ते-सरदवाडी व पास्ते जामगाव रस्ता, जामगाव-विंचूरदळवी या रस्त्याच्या दुरुस्तीसह डांबरीकरण असे रस्त्यांचे जाळे दळणवळणासाठी त्यांनी अद्ययावत केले. गावागावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजना वरदान ठरली आहे.

युवा नेते उदय सांगळे व जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे नायगाव गटातील अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटविण्यात सानप यांना यश आले. वाढदिवसानिमित्त युवा कार्यकर्ते संजय सानप यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी नागरिकांकडून सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT