नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडे विजयासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याची जाणीव असतानाही निवडणूक लढवून राजकीय भूमिका स्पष्ट करणे आवश्यक होते, अशी भावना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, उमेदवारी अर्जही दाखल न करता निवडणुकीतून माघार घेतल्याने उबाठात पक्षांतर्गत असंतोष वाढल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत बुधवारी (दि. ३) नाशिकमध्ये येऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवारी (दि. १) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपली. महाविकास आघाडीकडून आमदार वसंत गीते आणि अनिल कदम यांनी अर्ज घेतले होते.
मात्र शेवटपर्यंत कोणताही अर्ज दाखल करण्यात आला नाही. संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी हा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार घेण्यात आल्याचे स्पष्ट केले असले, तरी या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर नाराजीची लाट उसळली आहे. कार्यकर्ते आणि मतदानाचा अधिकार असलेल्या नगरसेवकांच्या मते, विजयाची शक्यता कमी असली तरी किमान अर्ज दाखल करून निवडणुकीची लढत कायम ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह टिकून राहिला असता आणि पक्षाची भूमिका जनतेसमोर स्पष्ट झाली असती.
निवडणुकीपूर्वीच माघार घेतल्याने मतदारांमध्ये नकारात्मक संदेश गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. खासदार संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यात निवडणूक न लढविण्यामागील कारणे, पदाधिकाऱ्यांची नाराजी आणि पक्षातील वाढती धूसफूस यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच संघटनात्मक पातळीवरील नाराजी दूर करण्यासाठीही बैठकीत प्रयत्न होणार असल्याचे बोलले जात आहे.
अपक्ष उमेदवारांना पाठबळ?
विधान परिषद निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीची कोंडी झाल्याची चर्चा सुरू आहे. पक्षातील असंतोष कमी करण्यासाठी काही अपक्ष उमेदवारांना अप्रत्यक्ष मदत करण्याची रणनीती आखली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राऊत यांच्या बैठकीत या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता असून, त्यातून काय भूमिका जाहीर होते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.