नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात रामराज्य आणायचे आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांचे राज्य आणायचे आहे. येत्या निवडणुकीत आपल्याला गद्दार गाडायचाच आहे. हा गद्दार एवढा गाडायचा की, पुढची अनेक वर्षे त्याला मान वर करता आली नाही पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत यांनी केले आहे.
येथे आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. बोलताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ढोंगी, लबाड नेते आहेत. २०१४ आणि २०१९ या निवडणुकांच्या वर्षावात ते नाशिकला आले आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. काल परवा नाशिकला येउन त्या आश्वासनांवर काही बोलले नाहीत, मात्र झाडू मारताना दिसले. त्यांनी झाडू मारण्यापेक्षा देशातील कष्टकरी, शेतकरी जनतेसाठी काही करणे आवश्यक आहे. प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मोदी ११ दिवस काही खात नाही, व्रतवैकल्ये करतात, ब्लँकेटवर झोपतात त्यात नवल काही नाही. देशातील ८० कोटी जनता आजही फूटपाथवर झोपते, अर्धपोटी असते. राममंदिर लोकार्पण सोहळ्यामुळे संपूर्ण देश आनंदात होता मात्र नरेंद्र मोदी फक्त रडत होते. निवडणुका आल्यावर हा स्टंट ते करत असतात. मात्र, पुलवामामध्ये ४० सैनिक मारले गेले, तेव्हा डोळ्यात पाणी आले नाही. हे फक्त मगरीचे अश्रू असल्याची टीकादेखील राऊत यांनी सभेमध्ये केली.
देशात प्रभू रामचंद्र विराजमान झाले. मात्र राज्यात गद्दारांचे राज्य आहे. ते उलथवण्याची जबाबदारी आता आपली आहे. सर्वांनी एकजुटीने काम करत उद्धव ठाकरेंचे हात मजबूत करावे. आपल्याला फक्त आगे बढाओच्या घोषणा द्यायच्या नाही, तर काम करायचे आहे. राज्य आणि दिल्लीची सत्ता उद्धव ठाकरेंच्या हातात द्यायची आहे. त्यांनी देशाचे नेतृत्व करावे, असेदेखील खा. राऊत यांनी यावेळी सांगितले.
शेतकरी धडा शिकवतील
यावेळी खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करताना मोदी केवळ शेतकरी आणि ठाकरे यांना घाबरतात. येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीत हे दोन्ही त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत अशी टिका त्यांनी केली.