मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
गिरणा सहकारी साखर कारखान्यात कथित १७८ कोटींच्या शेअर्स घोटाळ्याबाबत केलेले आरोप चुकीच्या माहितीवर आधारित असल्याची कबुली देत खासदार संजय राऊत यांनी न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली.
त्यानंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेला अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतल्याने हा वाद अखेर मिटला. विशेष म्हणजे दोन्ही नेते न्यायालयात हसत-खेळत एकत्र पोहोचले. गिरणा सहकारी साखर कारखाना येथे १७८ कोटी रुपयांच्या शेअर्स घोटाळ्याचा आरोप करत 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुरावरून मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊतांविरोधात मालेगाव न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता.
या प्रकरणी शनिवारी (दि. २१) खासदार राऊत येथील न्यायालयात हजर झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खासदार राऊत यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून दिलगिरी व्यक्त केल्याने तसेच, मंत्री भुसे यांनीदेखील दावा मागे घेतल्याने या प्रकरणावर अखेर पडदा पडला.
ज्यांच्यामुळे हा विषय निर्माण झाला ते आता आमच्या पक्षात नाहीत, ते सत्ताधारी पक्षात गेले आहेत. त्यामुळे त्याचा तपास 18 त्यांनीच करावा, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट करत, भुसे यांच्यावरील आरोप चुकीच्या माहितीच्या आधारे केल्याचे मान्य केले व दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे हा वाद न्यायालयीन प्रक्रियेतून अधिक पुढे न नेता निकाली काढण्यात आला.
नेमके प्रकरण काय ?
शिंदे गट वेगळा झाल्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये राऊत यांनी भुसे यांच्यावर गिरणा साखर कारखान्यात शेअर्स घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यासंदर्भातील बातमी दै. 'सामना'मध्ये प्रसिद्ध झाली. या आरोपांमुळे आपली बदनामी झाल्याचा दावा करत भुसे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
त्या काळात तालुक्यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी गावोगावी फिरून शेअर्स गोळा केले. मात्र, अपेक्षित रक्कम उभी राहू शकली नाही. जमा झालेली सुमारे १ कोटी ६७ लाख रुपये भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला आरटीजीएसद्वारे अदा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली होती. राऊतांच्या दिलगिरीनंतर मंत्री भुसे यांनी अब्रूनुकसानीचा दावा मागे घेतला आहे.