सिन्नर : समृद्धी महामार्गावर वाहनांच्या चाकांपुढे लोखंडी वस्तू टाकून वाहने थांबवायची आणि त्यानंतर प्रवाशांना मारहाण करून दागिने व रोकड लुटणाऱ्या टोळीतील सात जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली. या कारवाईनंतर आता या टोळीची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली असून, अटकेतील आरोपींवर यापूर्वीही दरोडा, जबरी चोरी, लूटमार, अपहरण, मारहाण तसेच अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या टोळीतील आणखी चार साथीदार फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
दि. २७ ऑगस्ट रोजी मलढोण शिवारातील समृद्धी महामार्गावर १० ते १२ जणांच्या टोळीने छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे जाणाऱ्या कुटुंबाची कार अडवून तब्बल १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटला होता. याच पद्धतीने अन्य वाहनांनाही अडवून प्रवाशांना लुटण्यात आले होते. या घटनेने महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या प्रकरणाचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि विविध तपास पद्धतींच्या आधारे आरोपी धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांची चार पथके धाराशिवमध्ये रवाना करण्यात आली होती. धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा, आरसीपी आणि क्यूआरटी पथकांच्या मदतीने रात्रभर पाळत ठेवून एकाच वेळी कारवाई करण्यात आली. त्यात नितीन उर्फ सुनील हिरामण शिंदे, गोविंद शिवाजी पवार, अशोक हिरामण शिंदे, अर्जुन व्यंकट पवार, धनाजी अर्जुन पवार, लखन भारत काळे आणि गोविंद उर्फ रामा व्यंकट पवार या सात जणांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक विमला एम., निफाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कांतिलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे, निरीक्षक दत्ता शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके तसेच धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच धाराशिव क्यूआरटी व आरसीपी पथकाच्या संयुक्त कारवाईमुळे अल्पावधीत दरोड्याचा छडा लागला.
अनेक जिल्ह्यांत गुन्ह्यांचे जाळे
अटकेतील आरोपींच्या पूर्वेतिहासाची माहिती तपासल्यानंतर या टोळीतील सदस्यांविरुद्ध धाराशिव, बीड, सोलापूर, लातूर, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, लूटमार, अपहरण, शस्त्रास्त्रांशी संबंधित तसेच अन्य गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. काही आरोपींवर महामार्गावरील दरोड्यांचेही गुन्हे दाखल असल्यामुळे ही टोळी महामार्गावरील प्रवाशांना लक्ष्य करून लुटमार करण्यामध्ये सराईत असल्याचे तपासातून पुढे आले आहे.
या साथीदारांचा समावेश
या टोळीतील अर्जुन बालाजी शिंदे (रा. खामकरवाडी, ता. वाशी), अनिकेत उर्फ अनिल बालाजी शिंदे (रा. खामकरवाडी, ता. वाशी), अशोक पोपट पवार (रा. गणेशनगर, येरमाळा, ता. कळम) आणि शंकर बाजीराव काळे (रा. कळम) यांच्यासह आणखी एका फरार साथीदाराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. फरार आरोपींपैकी काहींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे
अनेक जिल्ह्यांत गुन्ह्यांचे जाळे
अटकेतील आरोपींच्या पूर्वेतिहासाची माहिती तपासल्यानंतर या टोळीतील सदस्यांविरुद्ध धाराशिव, बीड, सोलापूर, लातूर, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, लूटमार, अपहरण, शस्त्रास्त्रांशी संबंधित तसेच अन्य गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. काही आरोपींवर महामार्गावरील दरोड्यांचेही गुन्हे दाखल असल्यामुळे ही टोळी महामार्गावरील प्रवाशांना लक्ष्य करून लुटमार करण्यामध्ये सराईत असल्याचे तपासातून पुढे आले आहे.