

नाशिक : ग्रामविकास अधिकारी आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शहरात धडकलेल्या धडक मोर्चामुळे संपूर्ण शहर हादरून गेले. आंदोलकांचा वाढता जमाव आणि तीव्र घोषणाबाजीमुळे आदिवासी विकास भवन परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलत संपूर्ण परिसराला अक्षरशः लष्करी छावणीचे स्वरूप आणले.
आंदोलक आक्रमक होऊन शासकीय इमारतीत घुसण्याचा प्रयत्न करतील ही शक्यता गृहीत धरून पोलिसांनी आदिवासी विकास भवनाभोवती लोखंडी बॅरिकेड्सचे मजबूत कडे उभारले. प्रवेशद्वाराला पूर्णपणे वेढून टाकत कडक सुरक्षा कवच निर्माण करण्यात आले. मात्र, पोलिसांची ही प्रचंड तटबंदीही आंदोलकांचा बुलंद आवाज आणि आंदोलनाचा उत्साह रोखू शकली नाही. बॅरिकेड्सच्या पलीकडूनही आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली.
उच्च पोलिस अधिकाऱ्याचा ताफा मैदानात
शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरवला गेला होता. स्वतः पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके, प्रमोद वाघ, शेखर देशमुख, तसेच पोलिस अधिकारी श्रीनिवास देशमुख, राकेश चौधरी, डॉ. आंचल मुदगल, योगेश देशमुख, हेमंत तोडकर, युवराज पत्की, पंकज भालेराव यांच्यासह संपूर्ण टीमने घटनास्थळी ठिय्या मांडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले.