Mumbai Agra highway protest May 26
लासलगाव : लासलगाव येथे कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प दराविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार आंदोलन छेडले. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कांद्याला किमान २४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देऊन शासनाने थेट बाजार समित्यांमधून खरेदी करावी, अशी मागणी करण्यात आली. येत्या आठ दिवसांत याबाबत निर्णय न झाल्यास २६ मे रोजी चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला. तसेच महाराष्ट्रातील शेतीमाल दिल्लीला जाऊ दिला जाणार नाही आणि कांदा उत्पादकांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात खासदार भास्कर भगरे, खासदार निलेश लंके, जयदत्त होळकर, सोनिया होळकर, तानाजी आंधळे, प्रवीण कदम, माणिकराव शिंदे, दत्तात्रय पाटील, शिवा सुरासे, संदीप दरेकर, छबुराव जाधव, राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, बाळासाहेब दराडे, रमेश पालवे यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी सध्याच्या कांद्याच्या दरांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना केवळ पाच ते सहा रुपये किलो दर मिळत असल्याने अनेक शेतकरी नैराश्यात असल्याचे त्यांनी सांगितले. धरणगाव खडक येथील शेतकरी विश्वनाथ उशीर यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा उल्लेख करत त्यांनी शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले.
केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांशी संबंधित प्रोड्युसर कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून कांद्याचे भाव पाडले जात असल्याचा आरोप केला. तसेच शेतीचे ज्ञान नसलेल्या व्यक्तींना कांदा अभ्यास समितीचे अध्यक्ष करण्यात आल्याचाही त्यांनी निषेध केला.
मुख्यमंत्री फक्त ट्विट करून प्रश्न सुटत नाहीत. त्यांनी प्रत्यक्ष बाजार समित्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असेही रोहित पवार यांनी म्हटले. इराण प्रश्नावर केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे इंधन संकट निर्माण होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
कांद्याला ३ हजार रुपये प्रतिक्विंटल दर देऊन शासनाने थेट खरेदी करावी, तसेच मागील कांदा अनुदानातील उर्वरित १५० रुपये प्रतिक्विंटल रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आंदोलनापूर्वी रोहित पवार, खासदार भास्कर भगरे, जयदत्त होळकर, संदीप दरेकर, सोनिया होळकर आणि सचिव नरेंद्र वाढवणे यांनी लासलगाव बाजार समितीत भेट देत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
खासदार निलेश लंके यांनी शासनाची धोरणे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत कांदा उत्पादकांनी आता रस्त्यावर उतरून ताकद दाखवण्याची वेळ आल्याचे सांगितले. तर खासदार भास्कर भगरे यांनी गेल्या काही वर्षांत शासनाने २२ वेळा कांदा निर्यातबंदी केली असल्याचे सांगत जानेवारी ते मे अखेरपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला दीड हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे, अशी मागणी केली.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार विशाल नाईकवाडे, निफाडचे पोलिस उपअधीक्षक के. के. पाटील आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.