नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
उत्तर भारतात होळी उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मुंबई आणि उपनगरीय भागातून अनेक चाकरमाने हा सण साजरा करण्यासाठी स्वगृही जात असल्याने रेल्वेवर मोठा गर्दीचा ताण पडतो. त्याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने होळी सणानिमित्त ३० अतिरिक्त होळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अंतर्गत लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून सुलतानपूर व वाराणसी दरम्यान ८ विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस रक्सौल, सहरसा व धनबाद दरम्यान चालणाऱ्या २२ गाड्यांच्या सेवांचा होळी विशेष म्हणून विस्तार करण्यात आला आहे.
सुलतानपूर व वाराणसीसाठी एसी विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस सुलतानपूर दरम्यान ४ एसी विशेष फेऱ्या चालविण्यात येतील. या गाड्या फेब्रुवारी अखेर व मार्चच्या सुरुवातीला नियोजित तारखांना धावतील. त्याचप्रमाणे सुलतानपूरहून मुंबईकडेही प्रत्येकी दोन फेऱ्या राहतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी दरम्यानही ४ एसी विशेष फेऱ्या चालविण्यात येणार असून, त्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात निश्चित तारखांना धावतील. वाराणसीहून मुंबईकडेही प्रत्येकी दोन परतीच्या फेऱ्या राहतील. या एसी विशेष गाड्यांमध्ये १६ एसी ३-टियर इकॉनॉमी डबे व २ जनरेटर व्हॅनचा समावेश आहे.
तिकीट बुकिंगसाठी संकेतस्थळ
होळी विशेष विस्तारित गाड्यांसाठी आरक्षण शुक्रवार (दि. २०) पासून सुरू झाले. तसेच एसी होळी विशेष गाड्यांसाठी आरक्षण २२ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. प्रवासी संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर अग्रिम आरक्षण कालावधीअंतर्गत तिकिटे बुक करू शकतात.