वणी : वणी मुळाणे रस्त्यावरील केआरटी हायस्कूललगत असलेला पुणेगाव धरणाचा डावा कालवा (पाटा) वरील पुल सध्या नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कालव्याला अनेक ठिकाणी संरक्षण भिंत नसल्याने तसेच असलेली भिंत जीर्ण व पडझड झालेल्या अवस्थेत असल्याने हा परिसर अत्यंत धोकादायक बनला आहे.
केआरटी हायस्कूलच्या पटांगणालगतून जाणाऱ्या या कालव्याची खोली तब्बल ३० ते ४० फुटांपेक्षा अधिक असून तळ पूर्णपणे खडकाळ आहे. याच ठिकाणापासून अवघ्या ४० मीटर अंतरावर वणी–मुळाणे रस्ता जातो. या रस्त्यावर असलेल्या पुलावरील कठडे अनेक ठिकाणी केवळ एक फुटापेक्षाही कमी उंचीचे राहिले आहेत. विशेष म्हणजे रस्ता सरळ असताना पूल तिरपा असल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकतो. त्यातच पुलावरील रस्ता अतिशय खराब अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.याच निष्काळजीपणाचा फटका दि. २६ जून २०२६ रोजी एका दुचाकीस्वाराला बसला. रात्रीच्या वेळी पुलाचा अंदाज न आल्याने तो थेट खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला. या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
या परिसरात KRT High School तसेच Santaji English Medium School असून शेकडो विद्यार्थी, पालक आणि स्कूल बसची दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. तरीही संबंधित महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांचे अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थ, संस्था चालक आणि नागरिकांनी वारंवार अर्ज देऊनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे “मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ती घटना अद्याप ताजी असताना प्रशासन अशा गंभीर धोक्याकडे दुर्लक्ष कसे करू शकते, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
विशेष म्हणजे पुलापासून पुढे सुमारे ५० मीटर अंतरावर हा कालवा भूमिगत करण्यात आला असून त्याची खोली १०० फुटांपेक्षाही अधिक असल्याचे सांगितले जाते. या परिसरात शाळा, रो-हाऊसेस आणि मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. मुळाणे, बाबापूर, भातोडा, धरमबर्डा, दुधखेड आदी गावांची वाहतूक तसेच शेतीमालाची ने-आण याच मार्गाने होत असल्याने हा रस्ता दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत चालला आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व सदस्य यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. इतका गंभीर प्रश्न डोळ्यासमोर असतानाही हे सर्वजण मुग गिळून गप्प का आहेत, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.नागरिकांनी तातडीने खालील मागण्या व्यक्त केल्या आहेत:कालव्यालगत मजबूत संरक्षण भिंत उभारावी
पुलावरील कठडे तात्काळ उंच व सुरक्षित करावेत
खराब रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावीधोकादायक ठिकाणी इशारा फलक व प्रकाशव्यवस्था करावीसंबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावीअन्यथा एखादी मोठी दुर्घटना झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.बळी गेल्यावरच जाग येणार का?”