नाशिक : किरण ताजणे
निफाड तालुक्यातील नैताळे येथील गायरान जमीन बोगस खरेदी-विक्रीद्वारे लाटल्याचा प्रकार 'पुढारी न्यूज आणि दै. पुढारीने' उघडकीस आणल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बुधवारी (दि. १८) मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.
नैताळे गावात गायरान जमिनीची पंचांच्या वारसांकडून अधिकार नसतानाही परस्पर खरेदी-विक्री करून जवळपास १२ हेक्टर १५ आर म्हणजे सुमारे ३० एकर गायरान जमीन लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. याबाबत गायरान जमीन देणाऱ्या कुटुंबाच्या वारसांनी आवाज उठवत प्रशासकीय चौकशीची मागणी केली होती. याबाबत 'पुढारी'ने मंगळवारी (दि. ३) 'बोगस खरेदीच्या माध्यमातून लाटली 30 एकर जमीन? या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करत प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम केले होते. दरम्यान, या प्रकरणाची महसूलमंत्री बावनकुळे यांनी गंभीर दखल घेत मंत्रालयात बैठक बोलावली आहे. तसेच नाशिकच्या महसूल विभागाला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महसूलमंत्र्यांनी या प्रकरणात अंतिम निर्णय घेतल्यास या प्रकरणाला मोठे वळण मिळण्याची शक्यता आहे. तर गायरान जमीन देणाऱ्यांच्या वारसांनी 'पुढारी'ने या प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल तसेच मंत्र्यांनी दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मंत्र्यांनी केवळ अश्वासन न देता कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.
गायरान जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी महसूलमंत्र्यांनी बैठक बोलविल्यानंतर नाशिक महसूल विभागाकडून जमिनीच्या फेरतपासणीचे काम सुरू झाले आहे. तसेच बोगस नोंदी, दस्त ऐवज आणि गायब झालेल्या फाइलची चौकशी होणार आहे.
पंचांच्या वारसांना देखरेखीचा अधिकार असताना भोगवटादार म्हणून नोंद असल्याचा गैरफायदा घेत काही पंचांनी बेकायदेशीर विक्री केली. धक्कादायक बाब म्हणजे विक्री देणाऱ्या पंचांच्या वारसांना फसवलं गेल्याचेही यात उघडकीस आले आहे. अनेकांना आपल्याला जमीन आहे याबाबतची सुद्धा कल्पना नव्हती तर काहींना तोकडी रक्कम देत गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य शासनाने श्वेतपत्रिका काढून राज्यभरातील गायरान जमिनींप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. यात अनेक लोकप्रतिनिधींचा सहभाग असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.