नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जागतिक दर्जाचे 'रामसर' स्थळ आणि महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात रविवारी (दि. २८) 'पावसाळीपूर्व पक्षी गणना २०२६' आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र वन विभाग आणि नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, निसर्गप्रेमी, पक्षीमित्र, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,
असे आवाहन वन विभागाने केले आहे. पावसाळ्याच्या आगमनापूर्वी अभयारण्यातील जलाशयांची पाण्याची पातळी, पाणथळ क्षेत्रांची स्थिती आणि उपलब्ध अन्नसाखळी यानुसार पक्ष्यांच्या हालचालींमध्ये बदल होत असतात. या पार्श्वभूमीवर स्थानिक तसेच अद्याप मुक्काम ठोकून असलेल्या स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींची अचूक संख्या आणि त्यांचा वावर नोंदविण्यासाठी ही शास्त्रीय गणना केली जाणार आहे.
सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांनी सांगितले की, या गणनेतून मिळणारी माहिती वन्यजीव संवर्धन, पर्यावरणीय समतोल राखणे आणि अभयारण्याच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पक्ष्यांच्या विविध प्रजातींची नोंद, त्यांच्या अधिवासाची स्थिती आणि जलस्रोतांचे निरीक्षण यामुळे भविष्यातील संवर्धन धोरण आखण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभाग.
नाशिकसह राज्यभरातील पक्षी निरीक्षक, निसर्गप्रेमी, वन्यजीव अभ्यासक, पर्यावरण क्षेत्रातील संशोधक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. लोकसहभागातून वन्यजीव संवर्धनाची चळवळ अधिक बळकट करण्याचा वन विभागाचा प्रयत्न असल्याचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांनी सांगितले. पक्षी गणनेचा प्रारंभ रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी ७ वाजता निफाड तालुक्यातील चापडगाव निसर्ग पर्यटन संकुल येथे होणार आहे.
सहभागी नागरिकांनी कॅमेरा, डायरी व पेन सोबत आणावेत. तसेच निसर्गाशी सुसंगत रंगांचे कपडे परिधान करून अभयारण्यात शांतता राखण्याचे आणि प्लास्टिकमुक्त वातावरण जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निसर्गाच्या सानिध्यात पक्षी विश्वाचा अभ्यास करण्याची ही अनोखी संधी असून, या वैज्ञानिक मोहिमेत अधिकाधिक निसर्गप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी केले आहे.