नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनसन्मान यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लोकप्रियता व त्यांनी केलेली कामे जनतेला माहिती आहेत. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत येत्या विधानसभेत वेगळे चित्र दिसेल, असा दावा पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला. जागा वाटपावरून महायुतीत कोणताही वाद नाही. भाजपचे आमदार अधिक असल्याने आमच्यापेक्षा त्यांच्या जागा जास्त असतील, असे पटेल यांनी स्पष्ट केले. नाशिक राेड रेल्वेस्थानक येथे पटेल यांनी रविवारी (दि.११) पत्रकारांशी संवाद साधला.
पटेल म्हणाले, अजित पवार हे प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात लक्ष देत आहेत. जनसन्मान यात्रेवेळी लोकांची भेटी होत आहेत. यात लोकसभेच्या काळातील फेक नॅरेटिव्ह लोकांना समजले असून, तेही आता आमचे चुकले, असे बोलत आहेत, असा दावा पटेल यांनी केला. निवडणुकीत जागावाटपाचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नसला तरी एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे. तीन पक्षांत जागावाटप करताना थोडा वेळ लागत आहे. परंतु, जागावाटपाहून आमच्यात कोणतेही भांडण होणार नाही, असे पटेल यांनी सांगितले.
राज्यात अडीच कोटी महिलांना लाडकी बहिणीचा लाभ होणार आहे. रक्षाबंधनला पहिला हप्ता आमच्या बहिणींना मिळणार आहे. योजनेमुळे आपल्या लाडक्या भावाला धन्यवाद द्यायला असंख्य बहिणी रस्त्यावर उतरत आहे. अजित पवार यांनी राखी बांधताना बहिणी प्रेमाने हेच परिवर्तन असल्याचे पटेल यांनी सांगितले. लोकसभेच्या वेळेस शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. परंतु, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ होत असून कांदा, कापूस, मका या शेतकऱ्यांना अधिक दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लाडका भाऊ अभियानातून युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकारने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचा दावाही पटेल यांनी केला.
काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लाडकी बहीण योजनेत बाेलताना सरकारने सत्तेसाठी योजना आणल्याची टीका केली होती. याबाबत बोलताना पटेल यांनी योजनेसाठी संपूर्ण बजेट करण्यात आले असून, ही कायमस्वरूपी याेजना आहे. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी होत आहे. महिलांना कोणतेही अधिकार न देणाऱ्यांना टीका करण्याचा अधिकार नाही, असा टोला पटेल यांनी थोरातांना लगावला. मनसे व उद्धव ठाकरे गटातील वादावर बाेलताना राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. खा. संजय राऊत हे सकाळी ९ चा भोंगा असून, त्यांच्या बोलण्यात तथ्य नाही, अशी काेपरखळी पटेल यांनी लगावली.