नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'पोषणदूत योजना' प्रभावी ठरत आहे. नोव्हेंबर २०२५ अखेर जिल्ह्यातील एकूण २०८ अतितीव्र कुपोषित बालकांपैकी ३९ बालके कुपोषणमुक्त (नॉर्मल श्रेणीत), तर ४५ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत परिवर्तित झाली आहेत.
जिल्ह्यात दि. १५ ऑगस्ट २०२५ पासून ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'पोषणदूत योजना' अंतर्गत कुपोषण निर्मूलनाच्या दिशेने सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने मंगळवारी (दि. ३) आरोग्य विभाग व महिला व बाल विकास विभागातील तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची समन्वय आढावा बैठक झाली.
यातून ही माहिती समोर आली. या योजनेंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील वर्ग एक व वर्ग दोन अधिकाऱ्यांनी अतितीव्र कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांच्या पोषण, आरोग्य व स्वच्छतेचा नियमित पाठपुरावा केला जात आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला एक बालक दत्तक देण्यात येऊन त्या बालकाच्या आरोग्य सुधारण्यासाठी वैयक्तिक लक्ष दिले जात आहे.
यासाठी तालुकास्तरीय नोडल अधिकारी म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे. पवार यांनी सर्व पालक अधिकारी यांचे कौतुक करीत उर्वरित बालकांवर तसेच डिसेंबर २०२५ मध्ये पोषण ट्रॅकरवर नव्याने नोंद झालेल्या ३६८ बालकांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, युनिसेफचे विभागीय सल्लागार नितीन वसईकर यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत दिलेल्या सूचना
बैठकीत कुपोषित बालकांची नियमित तपासणी, आवश्यक औषधोपचार, संदर्भसेवा, मासिक गृहभेटी, एन. आर. सी. मध्ये भरती, व्हीसीडीसीमधील आहार उपलब्धता, हिमोग्लोबिन तपासणी, लसीकरण तसेच स्थलांतरित कुटुंबातील बालकांसाठी विशेष समन्वय यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कुटुंब कल्याण पद्धती, दोन अपत्यांमधील अंतर राखणे यांविषयी पालकांना समुपदेशन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. 'पोषणदूत योजना' ही प्रशासनाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारी योजना असून, जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना निश्चितच मोलाची ठरणार असल्याचा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.