नाशिक

Onion Auction | महाराष्ट्रावर अन्याय ? लासलगावला शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव पाडले बंद

गणेश सोनवणे

लासलगाव(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – दक्षिणेतील बेंगलोर रोझ कांद्यावरील ४० टक्के शुल्क हटवल्याने लासलगाव येथील खाजगी बाजार समितीत सकाळी कांद्याचे लिलाव सुरू होताच कांद्याच्या बाजार भावात २०० रुपयांची घसरण झाल्याने संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले. या वेळी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणा विरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते.

गुजरात राज्यातील सफेद कांदा आणि बेंगलोर गुलाब रोझ कांद्याला परवानगी मात्र महाराष्ट्रतील कांद्याला वेगळा न्याय का असा सवाल शेतकरी प्रतिनिधी शिवसेना(ऊबाठा)गटाचे नेते शिवा सूरासे यांनी या वेळी उपस्थित केला. या वेळी 550 मेट्रिक टन मूल्य व 40 टक्के कांद्यावरील शुल्क हटवण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली.

गुजरात-कर्नाटकला वेगळा न्याय

  • केंद्र सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
  • केंद्र सरकारने यापुर्वी गुजरातच्या सफेद कांद्याला निर्यातीसाठी परवानगी दिली होती.
  • आता दक्षिणेतील बेंगलोर रोझ कांद्यावरील ४० टक्के शुल्क हटवले.
  • गुजरात कर्नाटकला वेगळा न्याय , महाराष्ट्रावर मात्र अन्याय होत असल्याचे शेतकरी म्हणत आहेत.
  •  महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या जखमेवर यातून पुन्हा एकदा मीठ चोळल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आंदोलन छेडण्याचा इशारा

केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचा आरोप या वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला. येत्या आठ दिवसांत कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.

सरासरी २००० ते सरासरी १६०० रुपयांचा भाव

या वेळी ठाकरे गटाचे नेते शिवा सूरासे, बाळासाहेब जगताप, प्रमोद पाटील, संतोष पानगव्हाणे, भैय्या भंडारी, गोरख संत यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज लासलगाव बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त २००० ते सरासरी १६०० रुपयांचा भाव मिळाला.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT