मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
रखडलेल्या नोमानी पुलाच्या कामामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी पुलावरच 'महापंचायत' भरवून लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाचा निषेध केला.
पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत झालेल्या चर्चेनंतर समाजवादी पक्षाचे गटनेते मुस्तकिम डिग्निटी यांनी मार्च २०२७ पर्यंत पुलाचे काम पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्याची हमी दिली. कामावर देखरेखीसाठी पाच स्थानिक नागरिकांची 'नोमानी पूल निर्मिती समिती'ही स्थापन केली.
७ जुलै रोजी मोहम्मद एहतेशाम जाविद हा बालक फरशी पुलावरून वाहून गेला होता. त्याचा मृतदेह सापडल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता. पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर रसूलपुरा, किल्ला आणि बागे महमूद परिसरातील नागरिकांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महापंचायतीचे आयोजन केले होते.
महापंचायतीत नागरिकांनी निषेधाचे फलक घेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. पुलाचे काम वर्षानुवर्षे रखडले असून, त्याचा फटका परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.
चर्चेनंतर डिग्निटी यांनी पुलाच्या कामाची जबाबदारी स्वीकारत पाच स्थानिक नागरिकांचा समावेश असलेली समिती जाहीर केली.
पुलाच्या कामाच्या प्रत्येक टप्प्यावर समिती लक्ष ठेवणार असून कामात दिरंगाई होऊ नये, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने मोसम नदीला पाणी आहे. त्यामुळे सद्यःस्थितीतील अडचणी लक्षात घेऊन मार्चअखेरपर्यंत काम पूर्ण करून पुलाचे लोकार्पण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अतहर हुसैन अश्रफी, नगरसेवक अब्दुल बाक़ी, समाजवादी युवाचे अध्यक्ष राहिल हनिफ यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
नोमानी पुलासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, त्यापैकी दोन कोटी रुपये शासनाकडून महापालिकेला प्राप्त झाले आहेत. मात्र, भूमिगत गटाराची मुख्य पाइपलाइन तसेच पुलावरून गेलेली विद्युत वाहिनी यामुळे प्रत्यक्ष कामात अडथळे निर्माण झाले. या अडचणी दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई झाली नाही. ठेकेदाराची देयके प्रलंबित असल्याने कामाची गती मंदावली आहे. प्रशासकीय पातळीवरील या दिरंगाईमुळेच पुलाचे काम रखडल्याचा आरोप आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी केला.
नोमानी पुलासाठी निधी मंजूर करून आणण्यासाठी आपण पाठपुरावा केला होता. पुलाचे काम नेमके कोणत्या कारणामुळे रखडले आणि त्यासाठी जबाबदार कोण, या संदर्भातील कागदपत्रे व पुरावे पत्रकार परिषदेत सादर करणार असल्याचे मुस्तकिम डिग्निटी यांनी सांगितले.