नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे उष्माघाताच्या संभाव्य घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे.
आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात खाटादेखील राखीव ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली. आरोग्य उपसंचालक (पुणे) यांनी जारी केलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने सर्व शासकीय आरोग्य संस्थांना उष्माघात प्रतिबंध आणि उपचारासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी एप्रिल ते जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे मृत्यू होण्याचाही संभव असतो. त्यातच आतापासूनच जिल्ह्यातील कमाल तापमान वाढत आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३८ अंशांवर जात आहे. जिल्हा उन्हात खूप तापतो. या पार्श्वभूमीवर उष्माघाताने कोणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. यासाठी जि. प. आरोग्य विभाग दक्ष झाला आहे.
आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे.
या आहेत मार्गदर्शक सूचना
सार्वजनिक ठिकाणी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यात बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, धार्मिक स्थळ, बँक, पेट्रोलपंप, मुख्य रस्ते व सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. उन्हात लोकांना विश्रांतीसाठी थंड सावलीच्या जागा निर्माण कराव्यात, धार्मिक स्थळे, धर्मशाळा दिवसभर लोकांसाठी खुल्या ठेवाव्यात.
प्राथमिक उपचार
उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यास प्रथम भरपूर पाणी प्यावे. उन्हातून आल्यानंतर थोडा वेळ बसावे आणि नंतर ग्लासमध्ये पाणी ओतून प्यावे. थंड, बर्फ टाकलेले पाणी पिऊ नये. रुग्णास वातानुकूलित किंवा मोकळ्या हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कुलर असावेत. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. आइस पॅक लावावा. आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ला घ्यावा.
उन्हापासून असा करा बचाव
दर तासाला १ ते १.५ ग्लास पाणी प्यावे. लिंबू सरबत, शहाळे, फळांचा ताजा रस, पन्हे, कोकम सरबत, ताक, लस्सी असे द्रवपदार्थ घ्यावेत. आराम करावा, सैलसर, पातळ, फिकट रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. गरज नसेल, तर उन्हात बाहेर फिरू नये. बाहेर जाताना गॉगल, टोपी, रुमाल, छत्री अथवा सनकोट सोबत हवा. बाहेर जावे लागलेच, तर उन्हापासून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी.
यंदा मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. पारा ४० अंशांवर गेला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यास वैद्यकीय सल्ल्यासाठी किंवा निदानासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात उष्माघात कक्ष सुरू केला आहे. यात खाटादेखील राखीव ठेवण्यात आल्या आहेत.-डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प.