नाशिक: यंदा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नीचांकी तापमानाचा नवीन रेकॉर्ड नोंदविला गेला असून नाताळानंतर थंडीचा कडाका काहीसा सौम्य होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे २० डिसेंबरला शहराचे किमान तापमान ६.९ तर निफाड तालुक्याचे तापमान थेट ४.५ अंश सेल्सिअवर घसरून नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांना हाडे गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागला होता. सोमवारी शहरात किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २८.१ इतके नोंदविले गेले. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत कमाल तापमानात थोडी वाढ होईल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, म्हणजे थंडी हळूहळू कमी होऊन हवामान सौम्य होईल, पण थंडी पूर्णपणे संपणार नाही असेही हवामान अभ्यासकांनी स्प्ष्ट केले आहे. सध्या तापमान कमी असल्याने द्राक्ष पिकाची काळजी घ्यावी लागत आहे, मात्र गहू आणि हरभरा पिकासाठी ही थंडी पोषक ठरत आहे.
आजपासून सूर्याचे उत्तरायण सुरु झाले आहे. त्यामुळे सूर्य उत्तरेकडे सरकत जाणार आहे.परिणामी हळूहळू कमाल तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल, परंतु लगेचच थंडी कमी होणार नाही. - दीपक जाधव, हवामान अभ्यासक.
कमाल तापमान वाढीची शक्यता
पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून किमान तापमान स्थिरावण्याची शक्यता आहे. किमान तापमानात लगेचच फारसा मोठा बदल होणार नाही, परंतु त्यात हळूहळू वाढ होऊन ख्रिसमसनंतर थंडी कमी होईल, असा अंदाज आहे.