नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात मंगळवारी (दि. ३०) दिवसभर रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू राहिल्याने, दिवसभरात ७.७ मिमी पावसाची नोंद झाली. उपनगरांमध्ये अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळल्याने, नागरिकांची विशेषतः वाहनधारकांची तारांबळ झाल्याचे दिसून आले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नाशिककर ज्या दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत, ती अद्याप कायम आहे. शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.
दुपारनंतर अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी रस्ते ओले झाले, तर वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला होता. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
शहरातील गंगापूर रोड, कॉलेज रोड, मुंबई नाका, सातपूर, अंबड, इंदिरानगर, पंचवटी, देवळाली कॅम्प तसेच इतर उपनगरांमध्ये दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी बरसत राहिल्या. शेतकरी आणि नाशिककरांचे लक्ष मात्र जोरदार पावसाकडे लागले असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हवामान विभागाने नाशिक शहर व जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मान्सूनने जिल्ह्यात हजेरी लावली असली, तरी अद्याप सर्वत्र जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा साठा वाढणे, शेतीच्या कामांना गती मिळणे आणि धरणांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होण्यासाठी आगामी काही दिवसांतील पावसाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.