नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने सात कोटी ३८ लाख २५ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील एक हजार ८४ गावे व वाड्यांमध्ये पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे,
त्यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने १६२ टैंकर सज्ज ठेवण्याचे नियोजन प्रस्तावित केले आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने धरणे, तलाव तुडुंब भरलेत. अनेक गावांतील साठवण तलाव व विहिरींमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.
त्यामुळे टंचाईचा पहिला टप्पा (ऑक्टोबर ते डिसेंबर) सुरळीत गेला. मात्र, जानेवारी ते मार्च हा दसरा टप्पा आणि एप्रिल ते जून या तिसऱ्या टप्प्यात तापमानात वाढ होऊन पाणीसाठ्यावर परिणाम होईल.
भूगर्भातील पाण्याची पातळी खालावेल तर सिंचन प्रकल्पांमधील पाण्याची पातळी घटेल, ही शक्यता लक्षात घेऊन, जिल्हा प्रशासनाने आधीच खबरदारीचे पाऊल उचलले आहे. या संभाव्य पाणीटंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने कृती आराखड्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा, खासगी विहिरींचे अधिग्रहण तसेच प्रगतिपथावरील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील टंचाईच्या अनुषंगाने जिल्ह्यात एकूण १६२ टैंकरसाठी सहा कोटी ३६ लाख ४८ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय, टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी उपलब्धतेसाठी खासगी विहिरी अधिग्रहणासाठी १ कोटी १ लाख ७७हजार रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे.
संभाव्य टंचाई कृती आराखडा
संभाव्य टंचाईग्रस्त गावे-वाडे-१,०८४
पाणीपुरवठ्यासाठी टँकर नियोजन-१६२
प्रगतिपथावरील नळयोजना -१४