नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील बहुचर्चित आदिवासी विकास महामंडळातील नोकरभरती घोटाळा प्रकरणात तब्बल अकरा वर्षांनंतर परीक्षार्थीची पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. उत्तरपत्रिकेत कमी गुण मिळालेले असताना अंतरिम यादीत अधिकचे गुण दाखवून ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.
याबाबत न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅबने) दिलेल्या अहवालानुसार पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली या घोटाळ्यातील मास्टरमाइंडचा शोध घेतला जात आहे. उमेदवारांच्या जाबजबाबावरून भष्ट्राचारी अधिकाऱ्यांपाठोपाठ आर्थिक पोळी भाजून घेणारे राजकारणीही यानिमित्त पोलिसांच्या रडारवर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापक ते शिपाई दरम्यानच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ५०० हून अधिक जागांसाठीची नोकरभरती प्रक्रिया जुलै २०१४ते २०१६ दरम्यान पार पडली होती.
या भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत शासनाने अप्पर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असता त्यात क्लीन चीट देण्यात आली होती. त्यावर पुन्हा आक्षेप नोंदवण्यात आला.
दिंडोरीचे तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल करत या संपूर्ण प्रक्रियेत ३०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी याबाबत सखोल चौकशी करत २०१७ मध्ये शासनाकडे अहवाल सादर केला होता.
या अहवालात अनेक उमेदवारांना मळ उत्तरपत्रिकेत कमी गण मिळालेले असतानादेखील त्यांना अंतरिम यादीत अधिकचे गुण दाखवण्यात येऊन त्यांची भरती केल्याचे उघड झाले होते. यानंतर ही प्रक्रिया रद्द करण्याबाबत सो कॉल्ड नोटीस देण्यात येऊन नवीन प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
मात्र, तत्पूर्वी भरती झालेले बरेच लोक सोडून गेले तर काहींनी कोर्टात धाव घेते स्टे ऑर्डर मिळविली होती. यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक जालिंदर आभाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन महाव्यवस्थापक, तत्कालीन अप्पर आयुक्त आणि पुण्याच्या कुणाल आयटी सर्व्हिसेस या कंपनीच्या संचालकांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्यानसार गन्हा करण्यात आला आहे.
अजून कोणाचा सहभाग ?
घोटाळ्यातील मास्टरमाइंडचा शोध घेतला जात आहे. यातील बहुतांश उमेदवार जिल्ह्यातील कसमादे पट्टयातील असल्याने उमेदवारांच्या जाबजबाबावरून भष्ट्राचारी अधिकाऱ्यांपाठोपाठ आर्थिक पोळी भाजून घेणाऱ्या राजकारणींवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. पोलिस तपासात आता काय काय समोर येतेय? या संपूर्ण घोटाळ्यात अजून कोणाकोणाचा सहभाग आहे? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.