नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या खोदकामांमुळे नाशिककरांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महापालिका प्रशासनाने सर्व ठेकेदारांना ३१ मेपर्यंत कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली होती.
मुदतीनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, या सूचनांचा ठेकेदारांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नसून शहरात अनेक ठिकाणी अद्यापही खोदकाम सुरू आहे.
शनिवारी रामवाडी पुलावर दुरुस्ती कामे सुरू असल्याने संबंधित मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा संपूर्ण भार मखमलाबाद नाका, मालेगाव स्टैंड, रविवार कारंजा आणि एमजी रोड या प्रमुख मार्गांवर आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
परिणामी या भागांत दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. याचा फटका नागरिकांसह व्यावसायिकांनाही बसला. शहरातील अनेक रस्त्यांवर आधीच दुरुस्ती व विकासकामे सुरू आहेत. त्यातच रस्त्यांच्या कडेला होणारे अनधिकृत वाहन पार्किंग आणि वाहनसंख्येत झालेल्या प्रचंड वाढीमुळे रस्त्यांची क्षमता कमी होत आहे. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावून वारंवार कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
वाहतूक कोंडीमुळे ग्राहकांची ये-जा कमी झाल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली आहे. दुसरीकडे, भर उन्हात नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रखडलेली विकासकामे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.