नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात सुरू असलेल्या विकासकामांबरोबरच विवाहसराईच्या हंगामामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. महापालिकेच्या नियोजनशून्य व गलथान कारभारामुळे शहरातील अनेक भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, भरउन्हात नागरिकांना तासन्तास वाहतुकीत अडकून राहावे लागत आहे. सध्या गंगापूर रोड, कॉलेजरोड, त्र्यंबक रोड, सिडको, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, नाशिकरोड, जेलरोड, नांद्रनाका, आडगाव नाका ते जत्रा हटिल परिसर तसेच मखमलाबाद रोड या भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असताना वाहनचालक आणि पादचारी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते खोदकामांमुळे अनेक मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, संबंधित ठिकाणी योग्य दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग किंवा वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था नसल्याने बाहेरगावाहून येणारे नागरिक गोंधळून जात आहेत. परिणामी, वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. त्यातच विवाहसमारंभामुळे लॉन्स आणि मंगल कार्यालयांबाहेर रस्त्यावरच चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने रस्ते अरुंद होत आहेत. अनेक भागांत अतिक्रमणे, रस्त्यालगतचे व्यवसाय, हातगाड्या, फेरीवाले तसेच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणारे चालक यामुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवरील फुटपाथ अतिक्रमणांमुळे गायब झाले आहेत. पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. नागरिकांच्या मते, मनपाने खोदकामे सुरू करण्यापूर्वी वाहतुकीचे नियोजन, पर्यायी मार्ग, पार्किंग व्यवस्था आणि अतिक्रमण नियंत्रणावर भर देणे आवश्यक होते. मात्र, नियोजनाअभावी शहरातील वाहतूकव्यवस्था कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. दुकानांसमोरील अतिक्रमणे आणि फेरीवाल्यांवर कारवाई करणे, मुख्य रस्त्यांवर फक्त दुचाकी पार्किंगला परवानगी देणे, नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती करणे तसेच मोठ्या वाहन कंपन्यांना स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यास भाग पाडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
वाहतूक कोंडीवर उपाययोजना का नाही?
शहरातील एमजी रोड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, सीबीएस, मुंबई नाका, शालिमार, दूधबाजार या गर्दीच्या भागांत रस्त्यांवरच चारचाकी वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. प्रशासनाने मोकळ्या जागा उपलब्ध करून कमी शुल्कत पार्किंगव्यवस्था उभारल्यास मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकतो, अशी मागणी नागरिकांकडून
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली कामे आतापर्यंत ७० ते ८० टक्के पूर्ण व्हायला हवी होती. मात्र, प्रत्यक्षात २० टक्केसुद्धा कामे झालेली नाहीत. आता पावसाळ्यात ही कामे आणखी रखडल्यास नागरिकांचे हाल वाढतील. महापालिका प्रशासन आपल्या आश्वासनांमध्ये अपयशी ठरत आहे. - केशव पोरजे, गटनेते