नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकचे तापमान पुन्हा चाळिशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने, उकाड्यात वाढ झाली आहे. गत आठवड्याच्या प्रारंभीच नाशिकचे तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते. या आठवड्याच्या प्रारंभी म्हणजेच सोमवारी (दि.१८) देखील तापमान ३९.९ अंश सेल्सिअसवर नोंदविले गेले आहे. दरम्यान, उन्हाचा चटका वाढल्याने, दुपारच्या सुमारास शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र दिसून आले. यंदाचा में महिना हा नाशिककरांसाठी चांगलाच तापदायक जात आहे.
महिन्याच्या प्रारंभापासूनच तापमानात मोठी वाढ नोंदविली जात आहे. या महिन्यात नाशिकचे तापमान ४२ अंशांपर्यंत नोंदविले गेले. हे तापमान ४४ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे नाशिककरांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कमाल तपामानाबरोबरच किमान तापमानात देखील वाढ झाल्याने, तीव्र उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहे. दरम्यान, नाशिकचे तापमान पुन्हा चाळिशीकडे वळत असल्याने, नाशिककरांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. शक्यतो, दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे टाळावे, घराबाहेर पडताना रूमाल, टोपी सोबत बाळगावी, भरपूर पाणी प्यावे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.
अघोषित भारनियमनाया जाच
शहरात सध्या अघोषित भारनियमन सुरू आहे. एकीकडे उकाड्यामुळे प्रचंड त्रास होत असताना, वेळी अवेळी वीज गायब होत असल्याने, नाशिककर घामाच्या धारांमध्ये भिजत आहेत.
काही भागात तर रात्रीच्या सुमारासदेखील वीज गायब होत असल्याने, उकाडा आणि डासांचा नाशिककरांना सामना करावा लागत आहे. महावितरणने सध्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. मात्र, वीज किती तास गायब राहणार याबाबतची कोणतीच माहिती दिली जात नसल्याने, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.