नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत असल्याचे विरोधाभासी चित्र समोर आले आहे. ग्रामीण भागात विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोत आटत चालल्याने प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
सध्या जिल्ह्यातील २४ गाव व वाड्यांमधील सुमारे ७ हजार ८३० लोकसंख्येसाठी ५ टैंकर कार्यरत आहेत. यामध्ये ३ गावे आणि २१ वाड्यांचा समावेश आहे. देवळा तालुक्यातील एका गावात, इगतपुरी तालुक्यातील दोन गाव व सात वाड्या तसेच सिन्नर तालुक्यातील १४ वाड्यांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या कमी असली तरी तापमानात वाढ झाल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून, साठ्यात हळूहळू घट होत आहे. जिल्ह्यातील धरणसमूहांत सध्या ४८.९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६०.७८ टक्के साठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ३९.३६ टक्के तर गंगापूर धरणात ६५.६३ टक्के पाणीसाठा होता. यावरून एकूण साठा वाढलेला असला तरी गंगापूर धरणातील साठा घटल्याचे स्पष्ट होत आहे.