नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील रिंगरोडबाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्री छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन रिंगरोडसंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देत प्रकल्पातील चुकीचे अलाइनमेंट, भूसंपादनातील त्रुटी, घर, विहिरी व गोठे बाधित होण्याचा प्रश्न तसेच काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देण्यात आली. त्यावर भुजबळांनी संयुक्त बैठकीत उपस्थित राहून तोडगा काढणार असल्याची शिष्टमंडळाला ग्वाही दिली.
छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या भेटीबाबत शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले की, रिंगरोडच्या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन सर्व अडचणी त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या आहेत. त्यावर मंत्री महाजन यांनी पुढील दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार, संबंधित अधिकारी, बाधित शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
या बैठकीत आपणही उपस्थित राहावे, अशी मागणी मंत्री भुजबळ यांच्याकडे केली असता, त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. भुजबळ म्हणाले की, या बैठकीला उपस्थित राहीन आणि मार्ग शेतकरी, लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यासमवेत चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा काढण्यासाठी प्रयत्न करीन. यापूर्वीही नाशिक शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे रस्ते व प्रकल्प राबविण्यात आले असून, त्यावेळी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती.
आताही रिंगरोड प्रकल्पामध्ये कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नसल्याचे भुजबळ म्हणाले. यावेळी मातोरी, मुंगसरा, मखमलाबाद, चांदशी, महादेवपूर, गोवर्धन, पिंपळगाव बहुला, पाथर्डी, वडनेर दुमाला, विहितगाव, माडसांगवी, विंचूर गवळी येथील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा
आवश्यक असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही मंत्री भुजबळ यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे रिंगरोडबाधित शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्याला आणखी बळ मिळाले असून, आगामी संयुक्त बैठकीकडे सर्व बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.