नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरसह जिल्ह्यात शनिवारी (दि. १२) दुपारपासून हलक्या ते मध्यमा स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दिलेली ओढ आणि वाढलेला उकाडा यामुळे चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला या सरींमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने नाशिकमध्ये दि. १२ व १३ सप्टेंबर रोजी मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली असून, त्यानंतरही दि. १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान पावसाचे वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यांना मोठा आधार मिळाला. मात्र, त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ ४८ टक्के पाऊस झाला असून, दिंडोरी वगळता, बहुतांश तालुक्यांमध्ये सरासरीच्या २० टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान नोंदले गेले. त्यामुळे सप्टेंबरमध्ये पाऊस ही तूट भरून काढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
सप्टेंबर हा खरीप पिकांच्या वाढीच्या आणि उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी दिल्यामुळे हलक्या व मध्यम जमिनीतील पिकांवर पाण्याचा ताण वाढला आहे.
सोयाबीन, मका, बाजरी, कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांना आता पावसाची मोठी गरज आहे. त्याचप्रमाणे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा भागातील भात, नागली, वरई पिकेही धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात ४ सप्टेंबरनंतर काही ठिकाणी हलक्या सरी झाल्या असल्या, तरी त्यातून जमिनीतील ओलावा पुरेशा प्रमाणात वाढलेला नाही. त्यामुळे सध्याच्या रिमझिम सरींऐवजी सलग तीन-चार दिवस चांगला पाऊस होणे आवश्यक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सध्याच्या पावसाचा तातडीचा फायदा खरीप पिकांना होणार असला, तरी पुढील काही दिवसांचा पाऊस रब्बी हंगामासाठीही निर्णायक ठरणार आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात चांगला पाऊस झाल्यास जमिनीतील ओलावा आणि भूजलपातळीत सुधारणा होण्यास मदत होईल. विहिरी, कूपनलिका आणि इतर जलस्रोतांना त्याचा फायदा झाल्यास रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो.
नाशिक परिसरात रविवारी (दि. १३) विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शहर व परिसरात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. तर जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.