नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीवर रविवारी (दि. 28) दिवसभर मंत्री छगन भुजबळ लक्ष ठेवत जिल्ह्यात पावसामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी तत्काळ सुरक्षात्मक तसेच इतर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सुचना मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
भुजबळ यांनी जिल्ह्यातील पाऊस व नुकसानाचा आढावा घेत पुरस्थितीवर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसील, पोलिस ठाण्यांना दिले. तसेच सर्व कार्यालयांत तातडीने नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावे. पूरपरिस्थितीत अडकलेले नागरिक तसेच जनावरे सुरक्षित स्थळी हलवावे असे निर्देश मंत्री भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दुरध्वनीव्दारे दिले
मंत्री भुजबळ यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दौरा रद्द करत येवला मतदारसंघात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांना संपर्क करत प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस स्टेशन पंचायत समिती सर्व ठिकाणी तत्काळ नियंत्रण कक्ष सुरू करावा अशा सूचना केल्या. तसेच मदत कक्षाचे दूरध्वनी क्रमांक सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रात जनतेसाठी तात्काळ प्रसिध्द करावेत, पूर परिस्थितीत काही तात्पुरती बेटे निर्माण झालेली आहे. अशा ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना तत्काळ सुटका करावीत, आवश्यक त्या ठिकाणी एनडीआरएफ किंवा एसडीआरएफ पथकांची मदत घ्यावी अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्नायांना केल्या.
जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश
पूरग्रस्त भागात बेघर कुटुंबांना मोफत धान्य तसेच मदतीची रक्कम तात्काळ वाटप सुरू करावी.
पूरबाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी तत्काळ स्थलांतरित करावे.
जीवित, पशुहानी झालेल्या ठिकाणी तत्काळ मदत करा, जखमींना सुरक्षित ठिकाणी हलवा.
पिकांचे, घरांचे व पायाभूत सुविधांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करावेत.
सर्व शासकीय रुग्णालयांच्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूं,औषध साठा पुरसा ठेवा.
जीवनावश्यक सेवा, दूरध्वनी, खराब रस्ते, विद्युत सेवा पूर्ववत सुरळीत करावी.
आपत्कालीन सेवेमध्ये आवश्यक सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द कराव्यात.
सोमवारी (दि.29) लहान मुलांच्या शाळा, अंगणवाड्यांना आवश्यकतेनुसार सुट्ट्या जाहीर.
धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे बाधित गावे, काठावरील कुटुंबे यांना सुरक्षितस्थळी हलवावे.