नाशिक : जिल्ह्यात गेल्या तीन - दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाल्यामुळे विविध धरणांतील विसर्ग मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक घटल्यामुळे जलसंपदा विभागाने विसर्ग नियंत्रित केला असून, त्याचा परिणाम गोदावरी नदीसह इतर प्रमुख नद्यांच्या प्रवाहावरही दिसून येत आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणाच्या दिशेने सोडण्यात येणाऱ्या पाण्याचाही प्रवाह कमी झाला असून, शनिवारी (दि. २५) सायंकाळी ६ वाजता नांदूरमध्यमेश्वर धरणातून ६४ हजार ७२६ क्युसेक विसर्ग सुरू होता.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून शुक्रवारी (दि. २४) मोठा विसर्ग होत असल्यामुळे नांदूरमध्यमेश्वरमधून सायंकाळी ६ वाजता तब्बल ९४ हजार ४७१ क्युसेक विसर्गाची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत अवघ्या एका दिवसात सुमारे ३० हजार क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आला. यात गंगापूर धरणाचा विसर्ग १५ हजार ३१४ वरून ८ हजार ३७० क्युसेक, कडवा धरणाचा १५ हजार ७८० वरून ५ हजार ९३२ क्युसेक, दारणा धरणाचा १६ हजार ५९८ वरून १३ हजार १०० क्युसेक, तर भाम धरणाचा ६ हजार १३८ वरून ३ हजार ८९२ क्युसेकपर्यंत खाली आणण्यात आला आहे.
याशिवाय भावली, पुणेगाव, वालदेवी आदी धरणांतील विसर्गही घट करण्यात आली आहे. मात्र पालखेड धरणाचा विसर्ग ३१० वरून ३ हजार ५४० क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला असून, गौतमी गोदावरी धरणाचा विसर्ग १ हजारवरून १ हजार ५०० क्युसेक करण्यात आला आहे. ओझरखेड धरणातून १ हजार ७५० क्युसेक, काश्यपी धरणातून ५०० क्युसेक आणि आळंदी धरणातून ३७ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नद्या, नाले आणि ओढ्यांतील पाण्याचा प्रवाहही ओसरू लागला आहे. मात्र प्रशासनाने नागरिकांना नदीपात्र, बंधारे आणि धरणांच्या खालच्या भागात अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन केले असून, पुढील पावसाच्या परिस्थितीनुसार विльгаंत आवश्यकतानुसार बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.