नाशिक : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक विचारांवर, रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावर प्रगत पुरोगामी असा आपला देश उभा आहे. त्यांचे विचार हे आपल्या राज्याचे वेगळेपण आहे. त्यांच्या विचारांचा वारसा सक्षमपणे पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा यासाठी महायुती एकमताने प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar, Deputy Chief Minister of Maharashtra) यांनी केले.
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरणप्रसंगी ते बोलत होते. नाशिकमध्ये उभारण्यात आलेला अर्धपुतळा हा राज्यातील सर्वात मोठा अर्धपुतळा असल्याचे त्यांनी सांगितले. या पुतळ्यामुळे नाशिकच्या लौकिकात भर पडली आहे. शिव- शाहू- फुले- आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांच्या कृतीतून, त्यांच्या विचारांमधून राज्यातील लोकमानस घडविण्याचे काम झाले आहे. आपल्या राज्याची सामाजिक बांधणी, जडणघडण ही देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. या विचारांवर महायुतीचे काम सुरू असल्याने या सरकारला कोणी हात लावू शकत नसल्याचेही ते म्हणाले.
पवार म्हणाले की, देशातील पहिली मुलींची शाळा ज्या भिडे वाड्यात सुरू झाली, त्या वाड्याला राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. त्या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि. २९) होत आहे. या स्मारकासाठी निधीची कमतरता भासणार नाही. तसेच पुरंदर तालुक्यात होत असलेल्या वसतिगृहासाठी निधी उभारून तेथे दीन, अनाथ, पीडित पालकांचे पाल्य अशांसाठी क्रांतिज्योती वसतिगृह आणि सातारा तालुक्यामधील नायगाव येथे १०० कोटी खर्चून १० एकरमध्ये वसतिगृह बांधत असल्याचे त्यांनी सांगितले.