पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील प्रस्तावित असलेल्या ६६ किलोमीटरच्या बाह्य रिंग रोड भूसंपादनाविरोधात रामकुंडावर दि. २६ मे पासून आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी नेते अॅड. कैलास खांडबहाले, साहेबराव दातीर व सचिन जाधव यांची प्रकृती पाचव्या दिवशी खालावली. त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, नेत्यांची प्रकृती खालावली असली, तरी आंदोलन थांबणार नसून, आता साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
या प्रस्तावित रिंग रोडमुळे जिल्ह्यातील २७ गावांमधील शेतकऱ्यांची सुपीक शेतजमीन संपादित केली जाणार आहे. त्यामुळे 'रिंग रोडऐवजी 'डीपी' (विकास योजना) व 'टीपी' (नगर रचना योजना) करावी, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे भूसंपादन करू नये, या मागणीसाठी बाधित शेतकरी गेल्या एकवटले आहेत.
आंदोलनस्थळी आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, हिरामण खोसकर यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, आंदोलकांनी या प्रांताधिकारी पवनकुमार दत्त यांचा प्रातिनिधिक दशक्रिया विधी करण्याचा प्रयत्न करत प्रशासनाचा निषेध केला होता.
संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असली, तरी अद्याप कोणताही ठोस मार्ग निघालेला नाही. शनिवारी (दि.३०) आंदोलक शेतकरी नदीपात्रात उतरून आंदोलन करणार होते. मात्र, सकाळीच तिन्ही मुख्य उपोषणकर्त्यांना डिहायड्रेशन, रक्तदाब आणि शुगरचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने आधी इंदिरा गांधी रुग्णालयात आणि त्यानं पुढील उपचारासाठी खास रुग्णालयात हलवण्यात आले.
२७ गावांतील शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
या भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या चिंचोली, वडगाव, पिंगळवाडे, लोखंडेवाडी, धामणवाडी, जोपूळ, पालखेड, चिंचखेड, ढकांबे, मानोरी, आशेवाडी, गौळवाडी, विंचूर गवळी, पाथर्डी, गौळाणे, आंबे बहुला, आडगाव, पारदेवी, सारूळ, राजूर बहुला, अंबड, सातपूर आणि चिंचोळे या २७ गावांतील शेतकरी आता आगामी आंदोलनाबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ शेतकऱ्यांची जमीनच नाही, तर त्यांचा विश्वासही संपादन केला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांचा हेतू प्रामाणिक असेल, तर त्यांनी 'ऑफ द रेकॉर्ड' चर्चा करण्याऐवजी 'ऑन द रेकॉर्ड' भूमिका मांडावी. आमच्या तिन्ही सहकाऱ्यांची प्रकृती खालावली असली, तरी आंदोलन थांबणार नाही, आता साखळी उपोषण सुरूच ठेवणार आहोत.- विनोद नाठे, शेतकरी नेते