नाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात येणारा बाह्य रिंगरोडच्या कामाचा शुभारंभलवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात होणाऱ्या कुशावर्तावरील ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी रिंग रोडच्या कामाचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.
बाह्य रिंगरोडसाठी भूसंपादनाला सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी थेट संपादनाला परवानगी दिली आहे. ५० टक्के भूसंपादन झाले आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. नाशिक शहराभोवती ६५.१५ किलोमीटरचा हा रिंगरोड असणार आहे. त्यामुळे कुंभमेळासाठी होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी हा रिंगरोड महत्त्वाचा ठरणार आहे.
६५.१५ किलोमीटरचा हा रिंगरोड परिसरातील २५ गावांमधून जाणार आहे. शेतकऱ्यांची जमीन बाधित होत आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी भूसंपादनाला सिंहस्थाचे विरोध दर्शवला आहे. मात्र, सक्तीचे भूसंपादन केले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगत त्यात शेतकऱ्यांचा आर्थिक तोटा होईल, म्हणून काही शेतकऱ्यांनी आता थेट खरेदीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे रिंगरोडच्या कामाला वेग आला आहे.
आतापर्यंत १५ एकर जमीन खरेदी झाली आहे. ५० एकर जमीन शासकीय आहे. त्यामुळे ती ताब्यात घेण्यास प्रशासनाला अडचण नाही. त्यामुळे रिंगरोडसाठी ५० टक्केपेक्षा जास्त जमीन उपलब्ध झाली आहे. मानोरी गावापासून थेट खरेदीला प्रारंभ झाला आहे.
६.५० हेक्टर जमीन खरेदी करावयाची आहे. त्यासाठी ६४.८७ कोटी रुपये निधी आवश्यक आहे. त्यापैकी ५ हेक्टर जमिनीची खरेदी होऊन ५५ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार हा प्रश्न नाशिककरांसाठी उत्सुकतेचा आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात ४ मे रोजी कुशावर्त येथे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पुरोहित संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले आहे. त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस येणार आहे. त्याचवेळी बाह्य रिंगरोडचा शुभारंभ केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.