

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या २८ रस्त्यांच्या कामांचा वेग अत्यंत संथ असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मनपाच्या बांधकाम विभागाने आक्रमक भूमिका घेत १८ ठेकेदारांना नोटिसा बजावल्या असून, कामे तातडीने गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत.
मनपामार्फत सुमारे १,२३० कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील २८ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, सध्या अपेक्षित ३० ते ४० टक्के प्रगतीऐवजी केवळ १५ ते २० टक्केच काम पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे. पूर्ण रस्ते झाल्यानंतर पुन्हा खोदकाम टाळण्यासाठी गॅस पाइपलाइन, भुयारी गटार, जलवाहिन्या, ड्रेनेज लाइन तसेच ऑप्टिकल फायबरसाठी युटिलिटी डक्ट तयार करण्याचे कामही एकाच वेळी सुरू आहे. त्यामुळे कामांचा वेग मंदावल्याचे कारण समोर येत असले तरी नागरिकांना होणारा त्रास वाढत आहे. शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून, नाशिककरांना रोजच याचा फटका बसत आहे.
या संथगतीबाबत नागरिकांसह लोकप्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल घेत बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारांकडून खुलासा मागवत नोटीस बजावली आहे. तसेच कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी वेग वाढवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
सिंहस्थासाठी सुरू असलेली रस्त्यांची कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्या केवळ १५ ते २० टक्के काम पूर्ण झाले आहे. कामांच्या संथगतीबाबत ठेकेदारांना नोटीस देऊन कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- संजय अग्रवाल, शहर अभियंता