लासलगाव : आशिया खंडातील प्रमुख कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरासरी ७० रुपयांची घट झाली असून, कमाल दरातही ५० रुपयांची घसरण झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडमार्फत प्रतिकिलो १२.३५ रुपये दराने कांदा खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शनिवारी (दि. १६) सकाळी बाजार समितीत आलेल्या विविध कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणावर टीका करीत, मागील वर्षाप्रमाणे किमान २४.१० प्रतिकिलो दराने कांदा खरेदीची मागणी केली. उत्पादन खर्च, इंधन दरवाढ आणि वाढती महागाई लक्षात घेता, शासनाने जाहीर केलेला दर परवडणारा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी (दि. १५) बाजार समितीत ७७१ वाहनांतून ११ हजार ६९२ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. त्यावेळी कांद्याला किमान ५००, कमाल १,६०० तर सरासरी १,१५० रुपये दर मिळाला. शनिवारी ४२५ वाहनांतून ६ हजार ५६६ क्विंटल कांद्याची आवक झाली. शनिवारी कांद्याला किमान ५००, कमाल १,५५१ आणि सरासरी १,०८० रुपये दर मिळाला.
भारत दिघोळे यांनी सांगितले की, नाफेडमार्फत थेट बाजार समितीत कांदा खरेदी होणे आवश्यक आहे. मागील वर्षी २४.१० दराने कांदा खरेदी करण्यात आला. यंदा केवळ १२.३५ दर जाहीर करण्यात आला आहे. महागाई आणि उत्पादन खर्च वाढलेला असताना, शासनाने मागील वर्षापेक्षा जास्त दर जाहीर करणे अपेक्षित होते. सरकार कांदा उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे.
सध्या कांद्याची शेती करणे अवघड झाले आहे. उत्पादन खर्च, इंधन दरवाढ आणि वाढती महागाई लक्षात घेता, शासनाने अधिक दर जाहीर करायला हवा होता. खर्चावर आधारित बाजारभाव मिळालाच हवा, तरच शेतकरी जगले.-वाल्मीक सानप, राजापूर (ता. येवला)
चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने मी चार हजार रुपये वाहतूक खर्च करून लासलगावला कांदा विक्रीसाठी आणला. मात्र, शासनाने जाहीर केलेले दर अत्यंत कमी आहेत. नाफेडमार्फत मागील वर्षाच्या दरानेच कांदा खरेदी करावी.-दिनकर शिंदे, नालेगाव (ता. वैजापूर)