

लासलगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत नाफेड व एनसीसीएफमार्फत सुमारे दोन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली जाणार आहे. मात्र, यंदा ही खरेदी नेमकी कोणत्या पद्धतीने केली जाणार, याबाबत शेतकरीवर्गात मोठी उत्सुकता आहे.
लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथील नाफेडच्या गोदामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कांदा साठवणुकीसाठी आधुनिक चाळी उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा नाफेडमार्फत थेट बाजार समित्यांमधून कांद्याची खरेदी केली जाणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही वर्षांपासून कांदा खरेदीची जबाबदारी शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत पार पाडली जात होती. मात्र या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्या होत्या. याची दखल घेत नाफेडच्या अध्यक्षांनी नाशिक दौऱ्यादरम्यान अनियमितता झाल्याचे मान्य केले होते. यानंतर मागील वर्षी ५ लाख मॅट्रिक टनावरून तीन लाख मेट्रिक टन उद्दिष्ट करत कांदा खरेदी घट करण्यात आली. ही खरेदी सहकारी
संस्थांमार्फत करण्यात आली. तरी देखील शेतकरी व विविध संघटनांकडून सातत्याने नाफेडने थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. लासलगाव व पिंपळगाव बसवंत येथे नव्याने उभारण्यात आलेल्या साठवणूक सुविधांमुळे नाफेडला थेट खरेदीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्याचे बोलले जात आहे.
जर नाफेडने बाजार समितीत थेट खरेदी सुरू केली, तर व्यापारी व नाफेड यांच्यात स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळू शकतो, अशी अपेक्षा जय किसान फोरमचे पदाधिकारी निवृत्ती न्याहारकर यांनी व्यक्त केली आहे.
कांदा सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत
लासलगाव व पिंपळगाव बसवंत येथील नाफेडच्या गोदामांमध्ये कांदा साठवणुकीसाठी आधुनिक कांदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. सुमारे साडेपाच हजार मेट्रिक टन कांदा साठवण्याची क्षमता असलेल्या या चाळींमध्ये कांदा खराब होऊ नये यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कांद्यामध्ये निर्माण होणारा गॅस आणि ओलावा नियंत्रित ठेवण्यासाठी कृत्रिम हवा देणाऱ्या ब्लोअर मशीनसह पाइपलाइन व्यवस्था बसवण्यात आली आहे. यामुळे कांदा सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत होणार आहे.