विधानसभा  Maharashtra Legislative Assembly
नाशिक

Nashik News | दहा मतदारसंघांवर शरद पवार गटाचा दावा

Maharashtra Legislative Assembly: जागावाटपात 'मविआ'मध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : लोकसभेतील यशानंतर शरद पवार गटाने मिशन विधानसभा हाती घेतले आहे. याअंतर्गत नाशिकमध्ये पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यात जिल्ह्यातील १५ पैकी १० जागांवर पवार गटाने दावा सांगितला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे आघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे. लोकसभेतील यशाचा वारू विधानसभेत कायम राखण्यासाठी आघाडीतील तिन्ही पक्ष उत्सुक आहेत. असे असले, तरी पक्षीय पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी या पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. शरद पवार गटाने मिशन विधानसभा हाती घेतले आहे. त्याअंतर्गत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बुधवारी (दि. २३) नाशिक जिल्ह्यातील १५ ही मतदारसंघांचा आढावा घेत वस्तुस्थिती जाणून घेतली.

सन २०१९ मध्ये राष्ट्रवादी एकसंध असताना जिल्ह्यातील १५ पैकी १० जागांवर निवडणूक लढवली होती. त्यावेळी जिल्ह्यातील सर्वाधिक सहा जागांवर पक्षाने मुसंडी मारली, तर चार जागांवर त्यांच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. दरम्यानच्या काळात पाच वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, राष्ट्रवादीचे दोन गट पडले. जिल्ह्यातील सहाही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तंबूत प्रवेश केला. त्यामुळे कागदावर सध्या अजित पवार गटाचे वर्चस्व दिसून येते. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दिंडोरीचा गड सर केला आहे. त्यामुळे शरद पवार गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याच दृष्टीने आता पक्षाने जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नाशिकमध्ये येत १५ही मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी पाटील यांनी इच्छुकांचे कान टोचताना पक्ष देईल तो निर्णय अंतिम असेल असे स्पष्ट केले. मात्र, गेल्या निवडणुकांमधील कल बघता, पवार गट जिल्ह्यातील १० जागांवर दावा सांगू शकतो. तसे झाल्यास ही बाब आघाडीतील अन्य दोन पक्षांसाठी अडचणीची ठरू शकते.

देवळालीत सर्वाधिक इच्छुक

२०१९ ला तत्कालीन राष्ट्रवादीने येवला, निफाड, सिन्नर, देवळाली, दिंडोरी व कळवणमधून विजय संपादन केला होता, तर नाशिक पूर्व व पश्चिम, बागलाण व नांदगाव येथे दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे या मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा राहू शकतो. दरम्यान, इच्छुकांच्या मुलाखतीवेळी देवळाली मतदारसंघातून सर्वाधिक उमेदवारांनी निवडणूक लढण्याची इच्छा पाटील यांच्याकडे व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT