नाशिक : राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत मध्यम तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येमध्ये दीड टक्क्यांनी घट झाली आहे. सन २०२२-२३ मध्ये राज्यात एकूण बालकांच्या प्रमाणात ५.०९ टक्के बालके मध्यम तीव्र कुपोषित होती त्यामध्ये घट होऊन यंदाच्या वर्षी २०२३-२४ मध्ये एकूण बालकांच्या प्रमाणात ३.९२ टक्के बालके एवढी संख्या आहे. अतितीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण १.९३ गेल्या वर्षी होते ते यंदा १.२१ टक्क्यांवर आले आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी राबविण्यात येत असलेल्या ग्राम बालविकास केंद्र, पोषण अभियान यांसारख्या उपक्रमांचे हे यश असल्याचे समोर आले आहे. (Activities like Gram Bal Vikas Kendra, Poshan Abhiyan have reduced the number of malnourished children)
दरम्यान, ग्रामीण, आदिवासी व झोपडपट्टी भागांतील शाळापूर्व बालकांची योग्य वाढ व विकास साधण्यासाठी एकात्मिक सेवा पुरविणे हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले जात आहेत. राज्यातील ५५३ बालविकास प्रकल्पांमध्ये ९७ हजार ४७५ अंगणवाड्या आणि १३ हजार ०११ मिनी अंगणवाड्यामार्फत योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमध्ये प्रामुख्याने सहा वर्षांखालील बालके, गर्भवती महिला व स्तनदा माता यांसाठी पोषण आहार, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, पोषण व आरोग्य शिक्षण आणि शालेय पूर्व शिक्षण यांसारख्या सेवा पुरविल्या जात आहेत.
कुपोषणमुक्ती करण्याच्या दृष्टीने राज्यात नाशिकच्या सुरगाणा पॅटर्नची चर्चा होत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रभावी स्तनपान कार्यक्रम आणि विविध योजनांच्या माध्यमातून कुपोषणमुक्ती कडे पाउल टाकले आहे. मार्च महिण्यात असलेली कुपोषित बालकांची संख्या तब्बल ११७ ने कमी झाली आहे. मार्चमध्ये तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांची संख्या २२४३ होती एप्रिल मे महिण्यात ती संख्या २ हजार ६६ वर आली आहे.
यामध्ये सर्वप्रथम सुरगाण्यातील आदिवासी बांधवांना पौष्टीक आहार मिळत नसल्याने कुपोषीत बालके होत असल्याचे निर्देशनास आले होते. कोंबडीचे अंडे खायला पौष्टिक असते. त्यामुळे बालकाच्या वजनात वाढ होते तसेच अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात जे दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवतात. या सर्व उद्देशाने कोंबडी वाटपचा निर्णय झाला होता. या उपक्रमातंर्गत पहिल्या टप्यात सुरगाणा तालुक्यातील ३४ बालकांची निवड करून त्यांच्या पालकांसाठी कोंबड्या दिल्या गेल्या. या दोन्ही उपक्रमाचे परिणाम प्रामुख्याने एप्रिल महिन्यात दिसून आले आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत, या महिन्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी झाली आहे.
मार्च महिन्यात जिल्ह्यातील २६ प्रकल्पांत ५ हजार १०९ अंगणवाडी केंद्रावर तीव्र कुपोषीत ३०९ बालके होती. तर, १९३४ मध्यम कुपोषीत अशी एकूण २ हजार २४३ बालेक कुपोषीत होती. एप्रिल महिन्यात तीव्र कुपोषीत बालकांमध्ये ५७ तर, मध्यम कुपोषीत बालकात १२० अशा एकूण १७७ ने घट झाली. या महिन्यात तीव्र कुपोषीत २५२ तर, मध्यम कुपोषीत १८१४ बालके होती.