नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सवलत योजनेमुळे महापालिकेच्या करवसुलीला मोठा हातभार लागला खरा पण, एसआयआरसाठी करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांची बीएलओ म्हणून नियुक्ती केली गेल्याने महापालिकेची करवसुली पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. कर्मचाऱ्यांअभावी कर भरणा केंद्रे ओस पडली आहेत.
यामुळे घरपट्टी, पाणीपट्टीच्या थकबाकीचा डोंगर वाढत जाणार आहे. नियमित करदात्यांसाठी महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी करसवलत योजना राबविली जाते. यंदाही ही योजना राबविली गेली. १ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या योजनेत घरपट्टी एकरकमी भरणाऱ्या मिळकतधारकांना आठ टक्क्यांपर्यंत करसवलत दिली गेली.
तब्बल २ लाख ४१ हजार ४७९ मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेत तब्बल ११९ कोटी ४९ लाखांची घरपट्टी महापालिकेच्या तिजोरीत जमा केली. या माध्यमातून करदात्यांना ५.२२ कोटींची करसवलत मिळाली असली तरी महापालिकेच्या करवसुलीलाही मोठा हातभार लावला.
३० जूनपासून एसआयआरच्या कामासाठी करवसुली विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक केली गेली. त्यामुळे करवसुलीचे कामकाज ठप्प झाले आहे. करवसुली विभागातील जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने करभरणा केंद्रे ओस पडली आहेत.
घरपट्टीची थकबाकी ५५० कोटींवर
200 करवसुलीचे कामकाज ठप्प झाल्याने घरपट्टीच्या थकबाकीत भर पडली आहे. घरपट्टीच्या थकबाकीचा आकडा आता साडेपाचशे कोटींच्या घरात पोहोचला आहे. पाणीपट्टीची थकबाकीही पावणेदोनशे कोटींच्या घरात गेली आहे. या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेला मोहीम राबवावी लागणार आहे. मात्र, या मोहिमेसाठी पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे महापालिका प्रशासन अडचणीत सापडले आहे.