नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेची १३ अग्रिशमन वाहने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बंद स्थितीत पडून असल्याचे धक्कादायक वास्तव स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी समोर आणले. शहरात मोठी दुर्घटना घडल्यास त्यावर नियंत्रण कसे मिळविणार, असा संतप्त सवालही सदस्यांकडून करण्यात आला. दरम्यान, सिंहस्थ निधीतून अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागासाठी ९ अत्याधुनिक बंब व ३ रॅपिड इंटरव्हेन्शनल व्हेइकल खरेदी करण्याचा प्रस्ताव सभेत मंजूर करण्यात आला.
सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत स्थायी समितीची सभा मंगळवारी (दि. १७) पार पडली. सिंहस्थ निधीतून अग्निशमन वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव चर्चेला आला असता, समिती सदस्या किरण गामणे यांनी सिडकोतील चार, सातपूरमधील तीन, शिंगाडा तलाव येथील मुख्य अग्निशमन केंद्रातील दोन तसेच अन्य अग्निशमन केंद्रातील ४ अशी एकूण १३ अग्निशमन वाहने तीन ते चार वर्षांपासून बंद स्थितीत पडून असल्याची तक्रार केली.
१२ ते १५ वर्षे जुनी असलेली ही वाहने दुरुस्ती करून अथवा प्रादेशिक परिवहन विभागाकडून नोंदणी मुदतवाढ करून वापरणे शक्य असताना, केवळ कोट्यवधींचा मलिदा खाण्यासाठी अग्निशमन विभागाकडून खरेदीचा बार उडविला जात असल्याचा आरोप गामणे यांनी केला.
वाहन खरेदीची जबाबदारी यांत्रिकी विभागाची असताना अग्निशमन विभाग वाहन खरेदी कोणत्या आधारे करते, असा प्रश्न करीत राहुल दिवे यांनी ९० मीटर उंचीच्या हायड्रोलिक प्लॅटफॉर्म खरेदीबाबत प्रशासनाला जाब विचारला या प्रश्नावर अधिक चर्चेला सभापती सानप यांनी नकार दिल्यामुळे गामणे व सभापती सानप यांच्यात खडाजंगी झाली.
दरम्यान, मुख्य अग्रिशमन अधिकारी संजय बैरागी यांनी सिंहस्थ निधीतून १८.१७कोटींची अग्रिशमन वाहने तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातून ९१ कोटींची खरेदी केली जाणार असल्याची माहिती सभागृहाला दिली. इंदिरानगर येथील राजसारथी सोसायटीतील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी गामणे यांनी केली. दीपाली कुलकर्णी यांनी वडाळा गावातील घरकुलाच्या इमारतींतील असुविधांचा प्रश्न मांडला.
बेरोजगारांना १० लाखांपर्यंतचे काम
विनानिविदा सुशिक्षित बेरोजगार अभियंता व स्थानिक मजूर सहकारी बांधकाम संस्थांना १० लाखांच्या आतील कामे निविदाविना देण्याच्या भारती ताजनपुरे, प्रा. सरिता सोनवणे, अदिती पांडे, रंजना बोराडे, राहुल दिवे, किरण गामणे, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, भाजप गटनेते श्याम बडोदे, रूपाली निकुळे, अजिंक्य साने, सुप्रिया खोडे, मंगला नन्नावरे यांच्या प्रस्तावाला सभापती सानप यांनी मंजुरी दिली. शासन निर्णयानुसारच हा प्रस्ताव मांडल्याचा दावा सदस्यांनी केला. मात्र, प्रशासनाकडून या प्रस्तावावर कुठलाही खुलासा करण्यात आला नाही.
एसटीपी कामांच्या चौकशीची मागणी
आगर टाकळी येथील एसटीपीच्या कामांची चौकशी करण्याची मागणी राहुल दिवे यांनी केली. एसटीपीच्या कामांतर्गत नदीपात्रात बेकायदा सुरूंग लावले जात असून, नदीकाठच्या घरांवर मोठे दगड पडत असल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याची तक्रार दिवे यांनी केली. भारती ताजनपुरे, रंजना बोराडे यांनीही एसटीपीच्या कामांबाबत तक्रार केली. यावर आयुक्त व सर्व सदस्यांसह एसटीपीच्या कामांचा पाहणी दौरा करण्याचा निर्णय सभापती सानप यांनी जाहीर केला.