नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशातील १६ व्या जनगणनेची प्रशासकीय तयारी महापालिका स्तरावर सुरू झाली असून, नाशिक महापालिका हद्दीतील जनगणनेसाठी तब्बल पाच हजार प्रगणकांची नियुक्ती केली जात आहे.
जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान राबविला जाणार असून, यात पहिल्या टप्प्यात घरगणना केली जाणार आहे. भारतीय जनगणनेला १५० वर्षांचा इतिहास आहे. भारतामध्ये १८७२ पासून जनगणना केली जात आहे. यंदाची ही १६वी जनगणना असून, स्वातंत्र्यानंतरची ही ८वी जनगणना असेल.
जनगणना ही गाव, शहर आणि वॉर्ड स्तरावरील प्राथमिक आकडेवारीचा सर्वांत मोठा स्रोत आहे. यात घरांची स्थिती, सुविधा व मालमत्ता, लोकसंख्या, धर्म, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, भाषा, साक्षरता व शिक्षण, आर्थिक क्रियाकलाप, स्थलांतर आणि प्रजनन यांसारख्या विविध घटकांवरील सूक्ष्म स्तरावरील माहिती उपलब्ध करून दिली जाते.
संकलित केलेली माहिती अत्यंत महत्त्वाची असते. यातून राष्ट्राच्या नियोजन आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या आकडेवारीची गरज भागविता येते. विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचननेनुसार महापालिका हद्दीतील जनगणनेसाठी आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनानुसार उपआयुक्त (प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर यांच्या नेतृत्वाखाली जनगणना कक्ष तयार करण्यात आला आहे. जनगणनेची प्रशासकीय तयारी सुरू झाली असून, जनगणेकरिता तब्बल पाच हजार प्रगणकांची नियुक्ती केली जाणार आहे. जनगणनेसाठी चार्ज अधिकाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा पुण्यातील यशदा येथे नुकतीच पार पडले.
दोन टप्प्यात जनगणना ही जनगणना
दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिला टप्पा १६ मे ते १४ जून यादरम्यान होत आहे. यात घर, यादी व घरगणना केली जाणार आहे. इमारती गणना, घरे आणि कुटुंबे यांची ओळख करून प्रणालीबद्ध नोंद केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना केली जाईल. घरगणना पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये राबविला जाईल. साधारणतः महिनाभरात लोकसंख्येची गणना पूर्ण केली जाणे अपेक्षित आहे.
जनगणनेसाठी मोबाइल अॅप
यंदाची जनगणना विशेष आणि उल्लेखनीय असणार आहे. कारण डिजिटल साधनांद्वारे अर्थात मोबाइल अॅपद्वारे केली जाणारी भारतातील ही पहिलीच जनगणना असणार आहे. या जनगणनेत प्रगणक स्वतःच्या मोबाइल फोनचा वापर करून घरांची माहिती डिजिटल पद्धतीने संकलित करतील. याशिवाय, कुटुंबांना निर्दिष्ट वेब पोर्टलद्वारे स्व-गणनेचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे. स्व-गणनेची अचूकता व पूर्णतता प्रगणक व पर्यवेक्षकांमार्फत तपासली जाणार आहे.