मनसेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महायुती, मविआ किंवा तिसऱ्या आघाडीचा घटक म्हणून सामोरे जावे, अशी अपेक्षा मनसैनिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. file
नाशिक

Nashik MNS | मनसैनिकांना हवी युती किंवा आघाडी

राज ठाकरे यांच्या भाषणाने पदाधिकाऱ्यांमध्ये हुरूप

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर केवळ 'अविश्वसनीय' अशी एका शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (दि.३०) मुंबईतील मेळाव्यात सडेतोड भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेसह भाजपचा समाचार घेतला. त्यांच्या दणदणीत भाषणामुळे उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये हुरूप निर्माण झाला असला तरी, काहीसा संभ्रमही निर्माण झाला आहे. त्यामुळे मनसेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महायुती, मविआ किंवा तिसऱ्या आघाडीचा घटक म्हणून सामोरे जावे, अशी अपेक्षा मनसैनिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महायुती विशेषत: भाजपशी जवळीकता निर्माण झाल्याने मनसैनिकांमध्ये संपूर्ण निवडणूक काळात संभ्रमावस्था बघावयास मिळाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर, विधानसभेतही राज्यातील काही मतदारसंघांत मनसेने महायुती उमेदवाराचा विजयी मार्ग प्रशस्त केल्याचे दिसून आले. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आमदार देवयानी फरांदे यांचा विजयी मार्ग सुकर करण्यासाठी उमेदवारी जाहीर केलेल्या अंकुश पवार यांना माघार घ्यावी लागली. जेव्हा गेल्या आठवड्यात राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले होते, तेव्हा आमदार फरांदे यांनी त्यांची भेट घेत आभारही व्यक्त केले. या सर्व घडामोडी ताज्या असतानाच, गुरुवारी (दि.३०) झालेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीवर विशेषत: भाजपवर जोरदार निशाणा साधल्याने मनसैनिक पुन्हा एकदा गोंधळून गेल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

अशात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेने महायुती किंवा महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जावे, असा एक मतप्रवाह पक्षात बघावयास मिळत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता, स्वबळावर निवडणूक लढणे म्हणावे तितके सोपे नसेल. मागील निवडणुकांचा इतिहास बघता, मविआ आणि महायुती असाच जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे मनसेनेदेखील घटक पक्ष म्हणून सहभागी व्हायला हवे. या पक्षांच्या विचारसरणीची अडचण येत असेल तर तिसऱ्या आघाडीचा पर्याय खुला ठेवावा, असेही मत स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून बोलून दाखविले जात आहे.

कार्यकर्त्यांची शंका, राज यांचा खुलासा

गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी जिल्ह्यातील निवडक पदाधिकाऱ्यांशी वन टू वन मनमोकळेपणाने चर्चा केली. यातील पक्ष स्थापनेपासून सोबत असलेल्या एका पदाधिकाऱ्याने 'तुम्ही भाजपच्या लोकांना कृष्णकुंजवर बोलावत जाऊ नका. कारण ते तुम्हाला भेटून गेल्यानंतर लोक 'मॅनेज पक्ष' म्हणून आपल्यावर टीका करतात' अशी खंत बोलून दाखविली होती. त्याबाबतचे सविस्तर वृत्त 'दै. पुढारी'ने प्रसिद्ध केले होते. त्याचा राज यांनी मेळाव्यात खुलासा केल्याचे दिसून आले. 'मी भाजपच्या लोकांना भेटतो म्हणजे तेव्हा मी तुम्हाला विकत नाही, किंवा मराठीचा बाणाही बोथट करत नाही.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT