नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि मतदारसंघातील दूषित वातावरणामुळे मी १ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ही निवडणूक पूर्णपणे माझ्या बाजूने झुकलेली असताना आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांबद्दल कमालीची नाराजी असतानाही, केवळ कौटुंबिक शांतीसाठी मी माझा निवडणूक प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, मी थांबलो म्हणजे संपलो असा याचा अर्थ नाही, राजकारणात मी यापुढेही सक्रियच राहीन, असे गोकुळ गिते यांनी यावेळी सांगितले. माध्यमांशी बोलताना गिते म्हणाले की, अर्ज दाखल केल्यानंतर २ आणि ३ जून रोजी आपल्याशी वरिष्ठ पातळीवरून संपर्क साधण्यात आला होता. ही जागा भाजपला सोडण्याचे ठरले होते आणि गणेश गिते यांना शब्द दिला गेला होता.
परंतु, मी निवडणुकीत उतरल्यामुळे मंत्री गिरीश महाजन आणि माझे असलेले निकटचे संबंध पाहता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात संशय निर्माण झाला होता. माझ्या उमेदवारीमागे गिरीश महाजन यांचा हात आहे, असे वातावरण तयार केले गेले. त्यामुळेच महाजनांवर राजकीय दबाव आणला गेला असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक काळात सुरू झालेल्या उलट-सुलट चर्चावर गिते म्हणाले की, माझ्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात घोडेबाजाराची चर्चा सुरू झाली होती. तीदेखील मी समोर आणली आहे. काही लोक म्हणतात मी चौकशीला घाबरून मागे हटलो.
पण मी स्पष्ट करू इच्छितो की, मी कोणत्याही चौकशीला घाबरलेलो नाही. सत्ताधारी पक्षासमोर मी छातीठोकपणे लढलो आहे. केवळ माझ्यावर काही वैयक्तिक आणि राजकीय गोष्टी आल्यामुळे, मला अशी आमदारकी नको, म्हणूनच मी थांबण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले.
'महायुती'चे नेते सोबत
वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर मी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तिन्ही मंत्री आणि आमदारांना मी शब्द दिला आहे. आगामी काळात आम्हाला नक्कीच योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास गिते यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांत आणि बंधू गणेश गिते काही अंशी नारा असल्याचे मान्य करत गिते यांनी, माझ्यासोबत महायुतीचेच लोक आहेत. परंतु, मी कोणालाही 'जाहीर पाठिंबा' हा शब्द सध्या वापरलेला नाही, असे सांगत संभ्रम कायम ठेवला आहे. शेवटी, माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.